भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी राहुल गांधींना राम जन्मभूमीबाबत मत विचारले आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम जन्मभूमीप्रश्नी नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आता भाजपने याप्रकरणात राहुल गांधींना ओढल्याचे दिसते. अयोध्येतील राम जन्मभूमीप्रकरणी शिया वक्फ बोर्डचा प्रस्ताव चांगला असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली असून, याप्रश्नी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मौन सोडून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डने सोमवारी राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद संपुष्टात आणण्यासाठी अयोध्येत वादग्रस्त जागेवर राम मंदिर तर लखनऊ येथे ‘मस्जिद ए अमन' तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी याचा मसुदा दि. १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात सोपवण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी याप्रकरणी राहुल गांधींना राम जन्मभूमीबाबत त्यांचे मत विचारले आहे.