सुभाष वेलिंगकर : पणजीतील मेळाव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी
पणजी : कोकणी ही आमची आवडीची भाषा असली तरी मराठी ही आमची मूळची भाषा आहे. मात्र, मराठीला दुय्यम स्थान दिल्यामुळे मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुढील काळात २०० मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. कोकणी प्रमाणेच मराठीला देखील राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली.
पाटो- पणजी येथील संस्कृती भवनच्या सभागृहात मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे मराठीप्रेमींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रा. वेलिंगकर बोलत होते. गो. रा. ढवळीकर, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, मिलिंद कारखानीस, उद्योजक अनिल खंवटे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोव्याची संस्कृती टिकवण्यासाठी कोकणीसोबत मराठीचाही मोठा वाटा आहे. मराठी भाषा ही गोव्यात फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. मराठी भाषेवर अन्याय होऊ नये म्हणून तिला राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता तर गोव्यातील सुमारे ५० मराठी शाळा बंद पडल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मराठी राजभाषेचे विधेयक सादर केले होते. त्यावर सुधारणा सुचवल्यानंतर त्यांनी ते विधेयक मागे घेतले, असे वेलिंगकर यांनी सांगितले.
गोव्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात कोकणीबरोबर मराठीचाही वाटा मोठा आहे. कोकणीला राजभाषा म्हणून मान्यता दिली, तसेच मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असे उद्योजक अनिल खंवटे म्हणाले.
अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी सरकार मराठी भाषेवर अन्याय करीत आहे, असा आरोप अशोक नाईक यांनी केला. गोव्यात मराठी भाषा शेकडो वर्षांपासून आहे. मराठी ही संस्कारांची भाषा आहे. तिला राजभाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, असेही अशोक नाईक यांनी स्पष्ट केले.
मराठीप्रेमींनी आपली मतबँक तयार करावी!
आगामी निवडणुकांमध्ये मराठी राजभाषेच्या समर्थनार्थ उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठीप्रेमींनी आपली मतबँक तयार करावी. नोकरभरती प्रक्रियेतही मराठी भाषेवर अन्याय होत असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले.