प्रश्न सादर करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत
पणजी : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाविशी चर्चा करून ते निश्चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक ७ जुलै रोजी विधानभवनात होणार आहे. पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी प्रश्न २८ जूनपासून घेण्यास सुरुवात झाली आहे. १५ जुलैपर्यंत प्रश्न स्वीकारण्याची मुदत आहे.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी अधिवेशनाची अधिसूचना जारी केली आहे. हे अधिवेशन १५ दिवस चालणार आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक ७ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांचेच झाले होते. त्यामुळे पावसाळी अधिवेशन जास्त दिवसांचे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार हे अधिवेशन १५ दिवस चालणार आहे.
दररोज अधिवेशनात किती लक्षवेधी सूचना घ्यायच्या, खासगी कामकाजाच्या दिवशी किती खासगी प्रस्ताव मांडायचे, याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाईल. अधिवेशनाचा कालावधी सभापतींनी ठरवला नसल्यास सरकार ठरवते. यावेळी सरकारने १५ दिवसांचे अधिवेशन निश्चित केले आहे.
अधिवेशन सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे. दुपारी १ ते २.३० या वेळेत जेवणासाठी मध्यंतर असणार आहे. सायंकाळी ६ नंतर सभागृहाचे कामकाज तहकूब केले जाईल.
प्रत्येक आमदाराला तारांकित प्रश्नांमध्ये कमाल तीन प्रश्न विचारता येणार आहेत. अतारांकित प्रश्नांसाठी १५ नोटिसा देता येतील.
लक्षवेधी सूचनेसाठी ६३ व्या नियमाअंतर्गत नोटिसा सकाळी १० वाजेपर्यंत सादर कराव्या लागतील. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा उल्लेख करणाऱ्या ‘झीरो अवर’साठीच्या नोटिसाही त्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सादर कराव्या लागतील.
खासगी कामकाजाचे असणार ३ दिवस
शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस असणार. २५ जुलै, १ ऑगस्ट आणि ८ ऑगस्ट हे खासगी कामकाजाचे दिवस असतील. २५ जुलैच्या कामकाजासाठी खासगी प्रस्तावाची नोटीस १० जुलैपर्यंत सादर करावी लागेल. १ ऑगस्टच्या कामकाजासाठी खासगी प्रस्ताव १७ जुलैपर्यंत सादर करावा लागेल. ८ ऑगस्टच्या खासगी कामकाजासाठी खासगी प्रस्ताव २४ जुलैपर्यंत सादर करावा लागेल.