‘माझी बस’ योजनेत खासगी कामगार महिलांना ५० टक्के सूट

मुख्यमंत्र्यांची घोषणा : बसमालक वार्षिक २.२० लाख कमवणार

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
29th June, 12:48 am
‘माझी बस’ योजनेत खासगी कामगार महिलांना ५० टक्के सूट

साखळी : गोव्यात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या युवती आणि महिलांना 'माझी बस' योजनेमार्फत प्रवासात ५० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथील रवींद्र भवनात ‘माझी बस’ या सुधारित योजनेच्या पुनर्शुभारंभप्रसंगी केली. 

‘'माझी बस’ ही योजना केवळ बसमालकांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीही आपलीशी वाटावी यासाठी तयार करण्यात आली असून, गोव्याच्या वाहतूक क्षेत्रात नवीन क्रांती आणण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेचा मोठा लाभ बसमालकांना होणार असून, ग्रामीण भागातील लोकांना, विशेषतः महिलांना सुरक्षित वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.  

गेल्या दोन वर्षांपासून या योजनेअंतर्गत बसमालकांच्या थकलेल्या पैशातील ५० टक्के रक्कम तत्काळ आणि उर्वरित ५० टक्के रक्कम दोन महिन्यांत देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी बसमालकांना प्रत्येकी रु. ५० हजारांची मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली, तसेच त्यांना स्वाईप मशीन्सही देण्यात आली.

कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी सदर योजना गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुधारताना बसमालकांचेही हित जपणारी असल्याचे सांगितले.

डिजिटल अॅपमुळे टॅक्सीवाल्यांचा फायदा : गुदिन्हो

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन करत, सरकारने आणत असलेल्या डिजिटल अॅपमुळे लोकांना जलद आणि सुरळीत सेवा मिळेल, असे सांगितले. मीटर बसवण्याची सक्ती हा न्यायालयाचा आदेश होता, मात्र टॅक्सीचालकांनी अॅपचा वापर केल्यास मीटरचा खर्च आणि त्रास वाचेल, तसेच व्यवसायात वाढ होईल. त्यासाठी सर्वांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्ड प्रणाली, ट्रॅकिंग अॅपमुळे वाहतुकीत क्रांती

* ‘माझी बस’ योजनेमुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवास आणि बसमालकांना अधिक नफा मिळेल. 

* या योजनेत सरासरी दिवसाला २०० किमी बस चालल्यास बसमालकाला महिन्याला २० हजार जास्त मिळणार, ज्यामुळे सरासरी महिन्याला २ लाख २० हजार अधिक मिळू शकतील. 

* लवकरच कार्ड व्यवस्था लागू होणार असून, यामुळे प्रवासी कोणत्याही बसने प्रवास करू शकतील आणि तिकिटाचे पैसे थेट बसमालकांच्या खात्यात जमा होतील.

* विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या तिकिटाचे पैसेही बसमालकांना मिळतील. कदंबचे पासही या बसमध्ये चालणार असल्याने प्रवासी संख्या वाढेल.

* ट्रॅकिंग डिव्हाइस आणि मोबाईल अॅपमुळे प्रवाशांना बसचे स्थान कळेल, ज्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होईल आणि अपघात घटतील.