कोळंबी, इसवण, माणकीची चलती : बांगडे-तारल्यांचे उत्पादन घटले
पणजी : गोव्याच्या मत्स्य उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत १,३८८ टनांनी वाढ झाली असल्याची माहिती मत्स्योद्योग खात्याने दिली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्यात एकूण १ लाख २६ हजार ९९० टन मासळी उत्पादन झाले होते, तर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यात किंचित वाढ होऊन ते १ लाख २८ हजार ३७८ टन झाले आहे. मात्र, २०२४-२५ ची आकडेवारी तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने मत्स्य उत्पादनाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
२०२३-२४ मध्ये कोळंबीचे उत्पादन ६,५४९ टन होते. २०२४-२५ मध्ये त्यात ३,५२२ टनांची वाढ होऊन १०,०७१ टन झाले. २०२३-२४ मध्ये लेपोचे उत्पादन १,३८४ टन होते. २०२४-२५ मध्ये ते ५३३ टनांनी वाढून १,९१७ टन झाले. २०२३-२४ मध्ये इसवणाचे उत्पादन १,५९४ टन होते. २०२४-२५ मध्ये त्यात १,२०३ टनांनी वाढ होऊन ते २,७९७ टन झाले.
गतवर्षी वेल्लीचे उत्पादन १४९ टन होते. २०२४-२५ मध्ये ते २१५ टन झाले. गतवर्षी लेपोचे उत्पादन १,३८४ टन होते. २०२४-२५ मध्ये ते १,९१७ टन झाले. २०२३-२४ मध्ये माणकीचे उत्पादन ४,०१३ टन होते. २०२४-२५ मध्ये ते वाढून ६,४०१ टन झाले.
गतवर्षीच्या तुलनेत बांगड्यांचे उत्पादन कमी झाले आहे. २०२३-२४ मध्ये बांगड्यांचे उत्पादन ५० हजार २१३ टन होते. तर २०२४-२५ मध्ये त्यात ७,४८५ टनांची घट होऊन ते ४३ हजार ७२८ टन झाले. २०२३-२४ मध्ये तारल्यांचे उत्पादन १८ हजार २२ टन होते. २०२४-२५ मध्ये ते १३ हजार ९०७ टन झाले.