आजपासून रथयात्रेला सुरुवात, कोणत्याही धातूविना निव्वळ लाकडापासून केले जातात रथ
पुरीः महाराष्ट्रात देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला जसे लाखो वारकरी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन अगदी तृप्त होतात, अगदी तसाच अद्भुत अनुभव आषाढ शुद्ध द्वितीयेला पुरी, ओडिशातील भाविक घेत असतात. आषाढ शुद्ध द्वितीयेला भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा असते.
केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातून नव्हे, तर जगातील अनेक ठिकाणाहून भाविक या रथयात्रेसाठी येतात. दरवर्षी या रथयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांचा आकडा लाखोंच्या घरात जातो. भगवान जगन्नाथ (श्री कृष्ण), त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना आकर्षक सजवून, तीन भव्य रथांमध्ये बसवून, शहरातून भव्य मिरवणूक (Jagannath Rath Yatra) काढली जाते.
अशी असते रथांची रचना
भगवान जगन्नाथाच्या यात्रेसाठीचे रथही विशेष आहेत. हे कडुलिंबाच्या लाकडापासून बनवले जातात. दरवर्षी बसंतपंचमीपासून रथयात्रेची तयारी सुरू होते. विशेष म्हणजे ते बनवताना कोणत्याही धातूचा वापर केला जात नाही. रथासाठी लाकूड मिळवण्यासाठी मजबूत आणि स्वच्छ वृक्ष पारखला जातो.
• जगन्नाथाचा रथ
जगन्नाथाचा रथ १६ चाकांचा असून त्याची उंची ४५ फूट आहे. लाल आणि पिवळा रंगाच्या या रथाच्या बांधणीचे काम अक्षय्य तृतीयेपासून (Akshaya Tritiya) सुरू होतं. याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते. हा रथ सर्वात मागे असतो.
• बलरामाचा रथ
बलराम हे जगन्नाथांचे थोरले बंधू असून थोरले असल्याने ते सर्वांचं नेतृत्व करतात. त्यांचा रथ सर्वात पुढे असतो. याला तालध्वज, असे म्हटले जाते. त्यांच्या रथाची उंची ४४ फूट आहे. या रथात निळ्या रंगाचा वापर ठळकपणे करण्यात येतो.
• सुभद्रेचा रथ
कृष्ण आणि बलरामांची बहीण सुभद्रा हिचा रथ दोन्ही भावांच्या संरक्षणाखाली राहतो. म्हणजे सुभद्रेचा रथ दोन रथांच्या मध्ये फिरतो. याला दर्पदलन किंवा पद्मा रथ, असे संबोधले जाते. त्याची उंची ४३ फूट असून रथ सजवण्यासाठी प्रामुख्याने काळ्या रंगाचा वापर केला जातो.
रथयात्रा आयोजनामागची धार्मिक मान्यता
या रथयात्रेबाबतची धार्मिक मान्यता अशी आहे की, एकदा सुभद्राने तिचे भाऊ कृष्ण आणि बलराम यांच्याकडे नगर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा दोन्ही भावांनी आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भव्य रथ तयार केला आणि त्यावर स्वार होऊन भ्रमणासाठी निघाले. या श्रद्धेला अनुसरून दरवर्षी पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन केले जाते.
मंदिराबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी
• जगन्नाथ मंदिरावर फडकणारा ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो. भारतातील कोणत्याही मंदिराचा ध्वज रोज बदलला जात नाही. परंतु जगन्नाथपुरीचं मंदिर हे एकमेव मंदिर आहे ज्याचा ध्वज दररोज बदलला जातो. दररोज एका पुजाऱ्याला उंच घुमटावर चढून ध्वज बदलावा लागतो. एक दिवसही ध्वज न बदलल्यास १८ वर्षं मंदिर बंद राहील, अशी जगन्नाथपुरी मंदिराची श्रद्धा आहे.
• तसेच या मंदिरावर कधीही पक्षी उडताना दिसत नाही. त्यावरून कोणतं विमानही जाऊ शकत नाही. एका विशिष्ट प्रकारच्या चुंबकीय शक्तीमुळे हे घडत असल्याचं म्हटलं जातं.
• या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाटांचा (Sea waves) आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो.
(सदर माहितीबाबत गोवन वार्ता कोणताही दावा करत नाही.)