दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन
पुरी : जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान पुरी येथे आज रविवारी २९ जून रोजी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेनंतर ओडिशा सरकारने तात्काळ कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाच यासाठी जबाबदार असल्याचे सांगत पुरीचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना पदावरून हटवले आहे. त्याचबरोबर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नवीन जिल्हाधिकारी आणि पोलीस आधीक्षकाची नियुक्ती
या निर्णयानंतर आयएएस अधिकारी चंचल राणा यांची पुरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पिनाक मिश्रा हे पुरीचे नवे पोलीस अधीक्षक असतील. दोघांनी रविवारी सायंकाळपर्यंत पदभार स्वीकारला. तसेच पोलिस उपायुक्त विष्णुपती व कमांडंट अजय पाधी यांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारने जाहीर केले आहे की, चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही भाविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, जखमींच्या वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकारकडून केला जाईल.
मुख्यमंत्री माझी यांनी या घटनेच्या सखोल चौकशीसाठी विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केल्याची घोषणा केली आहे. हे पथक सुरक्षेतील त्रुटी, गर्दी नियंत्रणाची कार्यपद्धती, पोलिसांची तैनाती आणि घटनास्थळी घेतलेले उपाय याबाबत तपास करेल. तपास अहवालानंतर आणखी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही संकेत दिले आहेत.
पुरी रथ यात्रा ही ओडिशाच्या धार्मिक संस्कृती आणि परंपरेतील महत्त्वपूर्ण सोहळा आहे. या यात्रेदरम्यान उद्भवलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मुख्यमंत्री माझी यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांत प्रशासनाच्या वतीने कोणतीही ढिलाई किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. पुढील काळात अशा कार्यक्रमांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल.