हिमाचलमध्ये ढगफुटीचा कहर, धर्मशालामध्ये पुरात दोघांचा मृत्यू

उत्तराखंडात भूस्खलन, जम्मू-काश्मीरसह राजस्थानातही अतिवृष्टीचा इशारा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th June, 02:45 pm
हिमाचलमध्ये ढगफुटीचा कहर, धर्मशालामध्ये पुरात दोघांचा मृत्यू

डेहराडून : नैऋत्य मान्सूनने पश्चिम हिमालयीन राज्यांमध्ये आपला कहर दाखवायला सुरुवात केली असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.



हिमाचल प्रदेशातील कुलू आणि धर्मशाला जिल्ह्यांमध्ये बुधवारी पाच ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या. धर्मशालामधील खनियारा भागात मनूणी खोऱ्यात अचानक आलेल्या पुरात निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पातील १० हून अधिक कामगार वाहून गेले. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून ११ जण अद्याप बेपत्ता आहेत. सैंज खोऱ्यातील रैला बिहाल येथे तीन जण पुरात वाहून गेले असून, सध्या १५० हून अधिक वाहनांसह सुमारे २,००० पर्यटक अडकले आहेत. लाहौलमध्येही २५ पर्यटक अडकल्याचे वृत्त आहे.



हवामान विभागाने गुरुवारी हिमाचल प्रदेशसाठी येलो अलर्ट जारी केला असून, चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्येही स्थिती गंभीर आहे. केदारनाथ धामच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून, चीन सीमेला जोडणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भूविज्ञान मंत्रालयाने टिहरी गढवाल, पौडी, डेहराडून, नैनिताल, चंपावत, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ या आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा आणि पूराचा इशारा दिला आहे. डेहराडून, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि नैनिताल जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्येही पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचे असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जम्मू विभागातील अनेक भागांत पूर व ढगफुटीचा धोका वर्तवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत कटरा येथे १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राजस्थानातही मान्सून सक्रिय असून, बारां जिल्ह्यातील मांगरोळ येथे १८० मिमी पाऊस झाला आहे. अनेक भागांत सखल भागांत पाणी साचले असून पुरासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बिकानेर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूर येथे २५ ते २७ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.



दिल्ली-एनसीआरमध्ये मात्र मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन अद्याप झाले नसून उकाडा व दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क ठेवले असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा