इंदूर-देवास मार्गावर ३२ तास वाहतूककोंडी

इंदूर-देवास मार्गावर प्रशासनाचे अपयश उजेडात

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
29th June, 06:05 pm
इंदूर-देवास मार्गावर ३२ तास वाहतूककोंडी

इंदूर : मध्यप्रदेशातील इंदूर-देवास महामार्गावर तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत अडकलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गुरुवार संध्याकाळपासून सुरू झालेली ही कोंडी शुक्रवारी रात्रीपर्यंत कायम होती आणि अंदाजे ८ किलोमीटर अंतरावर ४,००० हून अधिक वाहने अडकून पडली होती.
प्राथमिक माहितीनुसार, महामार्गाचे काम सुरू असतानाच अचानक मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, परिणामी वाहतूक एका लहान सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाल्याने कोंडी गंभीर झाली. जवळपासच्या गावांमधून कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता, ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
संदीप पटेल (३२) हे छातीत दुखत असल्याची तक्रार करत होते, मात्र रुग्णालयात नेण्याच्या प्रयत्नात गाडी कोंडीत अडकली आणि वाटेतच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.
कमल पांचाल (६२) यांची दीड तास कोंडीत अडकून असताना प्रकृती बिघडली, कारमध्येच चक्कर आली. देवास येथील खाजगी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
बलराम पटेल (५५) यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचाही प्राणवायूअभावी मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.
वाहतूक व्यवस्थेच्या या अपयशावर इंदूर जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी तत्काळ पावले उचलली असून एनएचएआय, आयएमसी, वाहतूक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला मार्ग मोकळा करण्याचे निर्देश दिले आहेत.
काँग्रेसकडून जोरदार टीका
विरोधी पक्ष काँग्रेसने या प्रकारावर कडाडून टीका केली. काँग्रेस प्रवक्ते अमित चौरसिया म्हणाले, तीन निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. प्रशासन आणि पोलिसांकडून गंभीर दुर्लक्ष झाले आहे. दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.

हेही वाचा