रस्ते अपघात असो, रेल्वे अपघात असो वा विमान अपघात, ते घडून गेल्यानंतर अनेक पातळ्यांवर तपासण्या, चौकशा होतात, काही सुधारणांची प्रक्रियाही पार पडते; परंतु अपघाताने कुटुंबांवर झालेल्या खोल जखमा चिरकाळ राहतात. अहमदाबादमधील जेटलायनर विमानाच्या दुर्घटनेत तर लंडनला निघालेल्या जवळपास सर्वच प्रवाशांवर काळाने घाला घातला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतात अलीकडील काळात वेगाने वाढणार्या विमान वाहतूक क्षेत्राच्या गरीमेला यामुळे धक्का बसणार आहे.
गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. अलिकडच्या काळात झालेल्या अतिभीषण अपघातामध्ये या दुर्घटनेची नोंद करावी लागेल. आजघडीला भारत जगातील आघाडीच्या विमान वाहतूक बाजारपेठांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात वेगाने वाढणार्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या नागरी विमान वाहतुकीसाठी देखील हा एक मोठा धक्का आहे.
या अपघाताने शेकडो कुटुंबांवर खोल जखमा केल्या आहेत. अपघातात दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दुसरीकडे, निवासी भागात विमान पडल्याने झालेले नुकसान देखील मोठे आहे. जवळपास चाळीस लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे विमान वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मेसवर कोसळले. त्यावेळी विद्यार्थी जेवण करत होते. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमीही झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. निश्चितच, या विमान अपघातातून विमान प्रवासाशी संबंधित सुरक्षा व्यवस्थेची नव्याने आखणी करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले आहे. ताज्या दुर्घटनेमागील कारणांची वस्तुस्थिती चौकशीनंतर बाहेर येईल परंतु जर हवाई प्रवासाच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिली असेल तर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
दुर्मिळ घटना
अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडिओंवरून, हे स्पष्ट होते की विमान उड्डाण करताना खाली पडले. टेकऑफनंतर दोन मिनिटांत विमान ज्या प्रकारे कोसळले ही एक दुर्मिळ घटना आहे. विमानाची टेकऑफ प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. जेव्हा विमान उंची वाढू लागते तेव्हा त्याला खूप वीज लागते. कारण त्यात भरपूर इंधन असते, विमान प्रवाशांनी भरलेले असते. इतका भार घेऊन खालून वर जाण्यासाठी मोठी ऊर्जा आवश्यक असते. विमानासाठी ही ऊर्जा निर्माण करण्याचे काम इंजिन करतात. टेकऑफनंतर अचानक वीजप्रवाह खंडित झाल्यास इंजिन बंद होते. अशा वेळी एकाच इंजिनच्या मदतीने विमान हाताळणे कठीण होते. त्यासाठी दोन इंजिनची व्यवस्था असते. परंतु विमानाची दोन्ही इंजिन एकाच वेळी काम करणे थांबवण्याची शक्यता कमी असते. या अपघातात असे घडले असण्याची शक्यता असून ती गोष्ट अधिक चिंताजनक आहे.
मानवी चुकीची शक्यता कितपत?
दुसरी गोष्ट म्हणजे अहमदाबाद-गॅटविक मार्ग हा १० तासांचा थेट प्रवास आहे. या प्रवासासाठी दोन पायलट पुरेसे ठरतात. आंतरराष्ट्रीय प्रवास १० तासांपेक्षा अधिक असल्यास तीन पायलट लागतात आणि १४ तासांपेक्षा जास्त असल्यास चार पायलट विमानात असतात. अपघातग्रस्त बोईंग जेटलायनरमधील कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर लाइव्ह कुंदर हे दोघेही भरपूर अनुभव असणारे होते. कॅप्टन सभरवाल यांना ८,००० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता; तर कुंदर यांच्याकडे जवळपास १,२०० तासांचा अनुभव होता. त्यामुळे विमान अपघातांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक शक्यता असणार्या ‘ह्युमन एरर’ किंवा मानवी चुकांमुळे अपघात घडण्याची शक्यता सकृतदर्शनी तरी दिसत नाही. विमान उड्डाण घेताच, लँडिंग गियर वर केले जाते, परंतु या विमानाचे लँडिंग गियर खाली होते. कदाचित, वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड आढळला असल्याने त्याने ते हाताळण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. खरं तर, विमानाचे उड्डाण आणि लँडिंग हा उड्डाणाचा सर्वात धोकादायक टप्पा आहे. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा विमान ६२५ फूट उंचीवर होते. यामुळे कर्मचार्यांना एकाच वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरची बॉडी रुंद आहे. तसेच त्यात दोन इंजिन असतात. त्यामुळे चौकशीदरम्यान हे विमान उड्डाणासाठी योग्यरित्या तयार होते की नाही, याची सर्वप्रथम तपासणी केली जाईल. एअर इंडियाच्या या विमानाने किती उड्डाणे पूर्ण केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फ्लाइट रडार-२४ मधील आकडेवारीनुसार, हे विमान एक दशकाहून अधिक जुने होते, अशी माहिती समोर येत आहे.
एएआयबीच्या स्थापनेनंतरचा पहिलाच अपघात
दोनच महिन्यांपूर्वी, नवी दिल्लीतील एअरक्राफ्ट अॅसिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी)येथे अत्याधुनिक डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रयोगशाळेचे वर्णन केंद्र सरकारने विमान वाहतूक सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केले होते. त्याचा उद्देश हवाई अपघाताची शक्यता ओळखणे आणि जबाबदारी सुनिश्चित करणे हा होता. बोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या अपघाताची चौकशी करण्याचे कामही या ब्युरोकडे सोपवण्यात आले आहे. या भीषण अपघाताची खरी कारणे काय होती हे शोधण्याची जबाबदारी आता एएआयबीकडे असेल. नजीकच्या भविष्यात विमानप्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देखील दिल्या जाऊ शकतात. या अंतर्गत, बोईंगच्या सुरक्षा रेकॉर्ड आणि ऑपरेशनल तपासणीची देखील हा ब्युरो सखोल चौकशी करेल. ऑपरेशनल प्रक्रियेची कडक तपासणी केली जाईल.
बोईंगबाबत प्रश्नचिन्ह
तांत्रिक त्रुटींमुळे, बोईंगच्या इतर अनेक ७८७ ड्रीमलाइनर्सच्या सुरक्षा प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. अलिकडच्या वर्षांत, अनेक व्हिसलब्लोअर्सनी ७८७ ड्रीमलाइनरच्या सुरक्षा उपायांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एफएएने ड्रीमलाइनर विमानांच्या उत्पादन आणि असेंब्ली प्रक्रियेची सखोल चौकशी केली होती. एफएएने बोईंगच्या सुविधांच्या ऑडिटमध्ये उत्पादन प्रक्रियेत अनियमितता आणि कंपनीच्या सुरक्षा संस्कृतीतील त्रुटी उघडकीस आल्या. व्हिसलब्लोअर्सनी असा आरोपही केला होता की बोईंगच्या कामकाजातील त्रुटी उघड केल्याबद्दल त्यांना टार्गेट करण्यात आले होते. रिपब्लिक एअरवेजचे सीईओ ब्रायन बेडफोर्ड, यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी एफएएचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर, भारतीय अधिकार्यांनी त्यांच्या अमेरिकन समकक्षांशी गंभीर चर्चा करायला हवी, असे या क्षेत्रातील अनेकांचे म्हणणे आहे. त्यातून मिळालेली माहिती गुजरात अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
‘बदलत्या परिस्थिती’ला धक्का
भारतीय हवाई क्षेत्रात शेवटचा मोठा अपघात २०२० मध्ये झाला होता, जेव्हा एअर इंडियाच्या उपकंपनीचे एक प्रवासी विमान केरळमध्ये पावसाने भिजलेल्या धावपट्टीवरून घसरले आणि त्याचे दोन तुकडे झाले. त्या दुर्घटनेत किमान १७ जणांचा मृत्यू झाला. २०१० मध्ये, मंगलोरमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान डोंगराळ धावपट्टीवरून घसरले. विमानाला आग लागली आणि १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्या काळात भारतातील वेगाने वाढणार्या विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षितता आणि व्यावसायिकतेबद्दल अनेक पातळ्यांवर लोक चिंतेत होते. पण अलीकडील काळात आता परिस्थिती सुधारू लागली होती आणि विमान वाहतूक क्षेत्र नव्या शिखरावर पोहोचू लागले होते. सरकारने अनेक नवीन योजना सुरू केल्या. अशा परिस्थितीत घडलेली ही दुर्घटना नव्याने भीती पसरवणारी ठरणार आहे. अर्थात, प्रत्येक अपघातानंतर, विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षिततेच्या नवीन मानकांवर विचारमंथन झाले आहे आणि आवश्यक बदल करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक तपासासाठी मानके निश्चित केली आहेत आणि प्रत्येक देशाने सूचनांचे पालन केले पाहिजे.
(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)