दोन महिन्यांचा साधा कारावास : प्रत्येकी ३४ हजारांचा दंड
म्हापसा : पर्वरी येथे मालमत्तेच्या वादातून डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांना मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली साल्वादोर द मुंद पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य विजय दळवी यांच्यासह श्वेता कांदोळकर व श्रीकांत आर्लेकर या तिघांना म्हापसा न्यायालयाने दोषी ठरवत दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
भा.दं.सं.च्या ५०४, ५०९, ३५४ व ३२३ कलमानुसार शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी छेड काढणे, विनयभंग व मारहाण करण्याच्या आरोपाखाली प्रत्येकी दोन महिने साधा कारावास व प्रत्येकी ९ हजार रूपये दंड. ही शिक्षा एकाचवेळी भोगायची आहे. दंडाची रक्कम जमा न केल्यास अजून सहा महिने साधा कारावास. तसेच भरपाई म्हणून फिर्यादी डॉ. मीनाक्षी मार्टीन्स यांना तिन्ही आरोपींनी प्रत्येकी २५ हजार रुपये रक्कम द्यावी, ही रक्कम ठरल्यावेळेत न दिल्यास अजून २५ हजार रुपये रक्कम द्यावी लागेल. या भरपाई रकमेतील ५ हजार रुपये राज्याच्या नावे जप्त केले जातील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
तर, भा.दं.सं.च्या कलम ५०६ (२) नुसार गंभीर परिणामाची धमकी दिल्याच्या आरोपातून तिन्हा आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. याबाबतचा निवाडा म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश निलीमा काणकोणकर यांनी दिला आहे.
सरकारी पक्षातर्फे वकील सुकेश तळावणेकर तर संशयितांच्यावतीने अॅड. एस. शेट व पी. गडकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास काम पर्वरी पोलीस स्थानकाचे तत्कालीन उपनिरीक्षक निखील पालेकर यांनी केले होते.
दरम्यान, मारहाण तसेच विनयभंगाचा प्रकार ३० जुलै २०१७ रोजी घडला होता. पोलिसांनी १ ऑगस्ट २०१७ रोजी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.
पर्वरीत झाली होती फिर्यादींना मारहाण
पर्वरीतील कदंब डेपोजवळ मालमत्तेच्या वादातून आरोपींनी फिर्यादी डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांना शिवीगाळ करीत तसेच त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड मारून त्यांना मारहाण केली होती. तसेच विनयभंग करून गंभीर परिणामाची धमकी दिली होती. यावेळी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारा मोबाईलही फोडला होता.