ईशान्य भारत जलमय! आसामसह अरुणाचल प्रदेशातही पूरस्थिती कायम

खराब हवामान, पूर, दरडी कोसळल्यामुळे बचावकार्यात अडथळा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
ईशान्य भारत जलमय! आसामसह अरुणाचल प्रदेशातही पूरस्थिती कायम

गुवाहटीः मान्सूनच्या सुरुवातीलाच ईशान्य भारताला मोठा तडाखा मिळाल्याचे चित्र दिसतंय. आसामसह अरुणाचल प्रदेशला पावसाने झोडपून काढले असून दोन्ही राज्यांमधील पूरस्थिती गुरुवारीही कायम होती. दरम्यान आज शुक्रवारी काही भागातील पाणी ओसरू लागल्याची माहिती हाती आली असून आसामच्या १६ जिल्ह्यांतील सुमारे साडेपाच लाख नागरिक पुरात अडकले असून पूर व दरडी कोसळल्याच्या घटनांचा सिलसिला सुरू झालाय. आसाममध्ये आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येतेय.


प्रमुख नद्यांसह उपनद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली
आसाममध्ये तीन ठिकाणी ब्रह्मपुत्रासह इतर नऊ प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाहत होत्या. कछार जिल्ह्यात बराक नदी आणि तिच्या उपनद्याही धोक्याच्या पातळीहून अधिक क्षमतेने वाहत होत्या.



वन्यजीवांनाही फटका
ब्रह्मपुत्रा, कोहोरा नद्यांच्या वाढत्या पाण्यामुळे काझीरंगा जंगलपट्टा मोठ्याप्रमाणात पाण्याखाली गेला आहे. याचा वन्यजीवांनाही फटका बसला असून पोबितोरा वन्यजीव अभयारण्याचा जवळपास ७० टक्के भाग जलमय झाला आहे.

 

लष्कर, स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू
उत्तर सिक्कीममधील चाटेन येथे भूस्खलनात अडकलेल्या एकूण ६३ नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून चाटेन येथे बचावकार्य सुरू असून, अद्याप ६४ पर्यटक अडकल्याचे प्रशासनाने सांगितले. खराब हवामान आणि आव्हानात्मक भूप्रदेशामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याने हे काम थांबवण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा