वादाला राज्यपाल आर्लेकरांचे सडेतोड उत्तर; म्हणाले, 'ते निसर्गाचे प्रतीक...'
केरळः राजभवनात आयोजित कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या भारत मातेच्या चित्रावरून केरळमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. संबंधित चित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये वापरले जाते, असा मुद्दा उपस्थित करत राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडी सरकारने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. दरम्यान, भारत मातेच्या चित्राबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, भारत माता हा भारतीय संस्कृतीचा भाग असून, ते निसर्गाचे प्रतीक आहे, असा युक्तिवाद केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी केला.
या घटनेसंबंधी मिळालेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी पर्यावरण दिनानिमित्त केरळच्या राजभवनात शेतकरी सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाचा समावेश करण्यात आला होता. याच गोष्टीला केरळचे कृषीमंत्री पी. प्रसाद यांनी विरोध केला. भारत मातेची प्रतिमा या कार्यक्रमाचा भाग नसताना तिच्या पूजनाचा कार्यक्रम का ठेवण्यात आला? असा सवाल प्रसाद यांनी केला.
हा तर संघाचा प्रचार
केवळ एका विशिष्ट संघटनेद्वारे वापरली जाणारी प्रतिमा संवैधानिक कार्यालय असलेल्या राजभवनाने वापरू नये. म्हणून आम्ही कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि सचिवालयातील दरबार हॉलमध्ये तो आयोजित केला. कार्यक्रमाची रूपरेषा राजभवनने तयार केली आणि आम्ही ती स्वीकारली. पण बुधवार त्यांनी यात अचानक बदल केला. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करणे, हे संवैधानिक नियमांविरुद्ध आहे. संबंधित चित्र रा. स्व.संघाच्या प्रचारासाठी वापरण्यात येते, त्यामुळे कोणत्याही सरकारी कार्यक्रमात ते वापरू नये, असा मुद्दा उपस्थित करत कृषीमंत्री पी. प्रसाद यांनी विरोध दर्शवला.