वैष्णवी हगवणे सोबत घडलेल्या घटनेतून आज एक गोष्ट दर्शनास येते की, आज लेक जन्माला येऊन सुरक्षित नाही, समाजात वावरताना देखील लेक सुरक्षित नाही. लेकीला दोन्ही घरांचा आधारस्तंभ म्हटले जाते, पण प्रत्यक्षात तिच्या त्यागाचे आणि अस्तित्वाचे मोल केले जात नाही.
मुलगी म्हणून जन्माला येणे ही चूक असते? की मुलगी म्हणून लग्न करून दुसऱ्या घरी जाणे ही चूक असते? आज जग प्रगती करत आहे, पण माणसाचे विचार बदललेले नाहीत. याचा सार हल्लीच घडलेल्या पुण्यातील घटनेतून पाहायला मिळतो. स्वतःच्या घरादाराला सोडून, त्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केलेल्या वैष्णवी हगवणे हिला सासरी छळले गेले. स्वतःच्या प्रेमापोटी तिने स्वतःचे घरदार सोडले. अशा तिच्या पतीलादेखील तिची कीव आली नाही. उलट तिच्या पती, सासू-सासरे, नणंदेकडून तिचा जाच केला गेला आणि शेवटी एका विवाहित स्त्रीचा जीव घेतला गेला.
'जन्माला आलेली लेक आई वडिलांची राणी असते, मात्र आयुष्यात शेवटी परकीच बनते'. या शब्दांचा खरा अर्थ आज डोळ्यासमोर येतो, जेव्हा वैष्णवी हगवणे हिच्यासोबत घडलेल्या घटनेची आठवण होते. प्रेम विवाह करूनही एका स्त्री वर संशय घेण्यात आला. वैष्णवीने स्वतःचे घरदार सोडून लग्न केले तरीही तिच्या माहेरच्यांनी तिच्या सासरी हुंडा दिला. हा हुंडा म्हणजेच ५१ तोळे दागिने, महागडी गाडी, चांदीच्या वस्तू आणि बऱ्याच काही गोष्टी हुंड्यामार्फत तिच्या सासरी दिलेल्या होत्या पण तरीही तिला छळून, तिची हत्या करण्यात आली.
त्यामुळे आज एका स्त्रीचे जगणे इतके अर्थहीन बनलेले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. एका मुलीने स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला ही चूक होती? की दिलेल्या सर्व गोष्टींमध्ये हुंडा कमी पडला ही चूक होती? या सर्व गोष्टींवर विचार केला तर असे वाटते की आज जग तंत्रज्ञान व आर्थिक प्रगती करत आहे, पण माणुसकीचा ऱ्हास होत चाललेला आहे. म्हणूनच या आधुनिक काळातही 'हुंडा घेणे' ही प्रथा चाललेली आहे मात्र त्याकडे समाज दुर्लक्ष करत आहे. समाजाच्या मनोवृत्ती अजूनही जुनाट आणि स्त्रीविरोधी आहेत.
'लेक माहेरचं सोनं, लेक परक्याचं धन' असे म्हणणे आज चूकीचे ठरणार नाही. जी घटना आज वैष्णवी हगवणे सोबत घडली ती घटना कुठल्याही मुलीसोबत घडू शकते. कारण आज समाजात विश्वासाला किंमतच राहिलेली नाही. ज्या विश्वासाचा घात स्वतः ची माणसे करतात त्यांच्यावर विश्वास ठेवणे कधीही व्यर्थच ठरेल. ज्या सासरी लेकीचा छळ होतो, जिथे तिला रडवले जाते, तिचा अपमान केला जातो अशा घरात तीची जागा परकीच बनते.
वैष्णवी हगवणे सोबत घडलेल्या घटनेतून आज एक गोष्ट दर्शनास येते की, आज लेक जन्माला येऊन सुरक्षित नाही, समाजात वावरताना देखील लेक सुरक्षित नाही. लेकीला दोन्ही घरांचा आधारस्तंभ म्हटले जाते, पण प्रत्यक्षात तिच्या त्यागाचे आणि अस्तित्वाचे मोल केले जात नाही. म्हणूनच 'लेक आईवडिलांची शान असते, पण सासरी तिला त्रास दिला तर त्या त्रासाचा शेवट संहारातच होतो' हा इशारा समाजाने गांभीर्याने घ्यायला हवा.
घडलेल्या या घटनेतून हे स्पष्ट होते की, लेक माहेरचे पाखरू असते, माहेरची शान असते. सासरी छळ भोगणारी स्त्री, माहेरचीच संपत्ती असते.
म्हणूनच, लक्षात घ्या -
लेक असते खूप खास, ती असते आईवडिलांची शान.
झेलते ती खूप घाव, त्यामुळे करू नका अशा लेकीला त्रास, नाहीतर होणार तुमचाच सर्वनाश.
पूजा भिवा परब
पालये, पेडणे