आनंद बहर

मुलीचे संगोपन, शिक्षण यामुळे नवऱ्याचा पगार आता त्यांच्या संसाराला पुरत नव्हता. हळूहळू तिने नोकरदार, चाकरमान्यांना जेवणाचे डबे पुरवायला सुरुवात केली. तिने घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते ती आपल्या कमाईतून भरू लागली. घरगुती छोट्या व्यवसायात ती व्यवस्थित स्थिरावली होती.

Story: तिची कथा |
31st May, 12:50 am
आनंद बहर

विभाच्या घराच्या पुढील अंगणात विहिरीशेजारी लावलेला जाईचा वेल यंदा भरगच्च कळ्यांनी बहरला होता. हिरव्याकच पानातून किंचित गुलाबी रंग मिरवत, पावसाचे पाणी पिऊन, न्हाऊन तो तृप्त जाईचा वेल आनंदाने डोलत होता. त्याचे ते लोभावणे रूप पाहून विभा म्हणाली, "विभव, बघ ना रे माझ्या जाईच्या वेलीला!" विभव हर्षाने गंधित, सुंदर विभाच्या मुखकमळाकडे विस्मयाने बघतच राहिला. पन्नाशी उलटली तरी विभाच्या मुखकमळावर चाळीशीची सय होती. खट्याळ बालिकेसारखी ती जाईच्या त्या बहरलेल्या वेलावर मायेने हात फिरवत होती. विभा त्या बहरलेल्या वेलासारखीच आज सुखा-समाधानाने बहरली होती.

विभवला आठवले, मोठ्या विश्वासाने विभाच्या कष्टकरी, शेतकरी आई-वडिलांनी विभाचा हात एका शुभमुहूर्तावर "नांदा सौख्यभरे" म्हणत विभवच्या हातात दिला होता. विभव एक निर्व्यसनी, कष्टाळू, होतकरू मुलगा होता आणि चांगल्या कंपनीत कामाला होता. दोघांच्याही घरची परिस्थिती तशी खाऊन-पिऊन सुखी होती. आहे त्यात समाधान मानणारी, कष्टाळू, लग्नाआधी आपल्या आई-वडिलांना कुळागारात, बागायतीत कामात मदत करणारी अशी विभा खूप समजूतदार मुलगी होती. लग्नानंतर विस्मिता नामक सुंदर कन्यारत्न त्यांच्या संसारवेलीवर बहरले. "पहिली बेटी धनाची पेटी" म्हणत सर्वत्र आनंदी आनंद झाला.

विभा जातीने हुशार, कष्टाळू होती. लग्नाआधी मनात असूनही ती बारावीनंतरचे पुढचे शिक्षण घेऊ शकली नव्हती. तिला वाचनाची खूप आवड होती, पण दिवस कामात कधी सरायचा हे तिचे तिलाच कळत नव्हते. वाचनाची, लिहिण्याची आवड मनातल्या मनात रुंजी घालत राहिली. लग्नानंतर शहरात एखादी नोकरी करावी अशी तिची मनीषा होती, पण मुलीचे संगोपन, घरकाम यातच तिचे दिवस सरू लागले.

विस्मिता शाळेत जाऊ लागली तशी विभाने घरगुती सर्व प्रकारचे लाडू, फराळ बनवायला सुरुवात केली. तिच्या हाताला चव होतीच. हळूहळू गिऱ्हाईकांकडून फराळांची मागणी येऊ लागली. मुलीचे संगोपन, शिक्षण यामुळे नवऱ्याचा पगार आता त्यांच्या संसाराला पुरत नव्हता. हळूहळू तिने नोकरदार, चाकरमान्यांना जेवणाचे डबे पुरवायला सुरुवात केली. तिने घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते ती आपल्या कमाईतून भरू लागली. घरगुती छोट्या व्यवसायात ती व्यवस्थित स्थिरावली होती.

विस्मिताही आता सहा वर्षांची झाली तशी विभाच्या माहेरचे, सासरचे "विस्मिताला आता भाऊ पाहिजे" असे विभाला अधूनमधून बजावू लागले. विभाने मात्र ठाम निश्चय केला होता की, आपल्याला एकच कन्यारत्न बास. तिला भरपूर शिकवून स्वतःच्या पायावर उभी करायची आणि तिला तिच्या पती विभवची साथ होतीच. विस्मिता हळूहळू मोठी होऊ लागली. जातीने हुशार आणि समजूतदार तर ती होतीच शिवाय प्रत्येक गोष्टीत आई-वडिलांचा विचार करायची. इंजिनिअरिंगचे शिक्षण तिने स्वकष्टाने आणि शिष्यवृत्तीवर घेतले. विस्मिताला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. विस्मिता रूपाने सोज्वळ, सुंदर होती, त्यामुळे विभाला तिची काळजी वाटू लागली. एका मुलीची आई म्हणून विस्मिताला कामावरून घरी यायला उशीर झाल्यावर ती अस्वस्थ व्हायची. 

आता विस्मिताच्या लग्नाची चिंता विभाला सतावत होती. वयात आलेल्या पोरीचे वेळेत लग्न व्हायला पाहिजे म्हणून ती विस्मितासाठी योग्य उपवर शोधत होती. विस्मिता आई-वडिलांच्या सांगण्याबाहेर नव्हती. ती खूप समजूतदार होती. आपल्या आईच्या मनाची घालमेल तिला समजत होती. आपल्या आईने कष्टातून उभा केलेला संसार तिने पाहिला होता. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा विभवची नोकरी धोक्यात होती, त्यावेळी आपल्या आईने निर्धाराने सांभाळलेला संसार तिने बघितला होता. कोरोना महामारीच्या काळात विभवला अर्धाच पगार मिळत होता. आपल्या आईने आपल्या वडिलांचे मनोबल सावरले, त्यामुळे कोरोना काळानंतर त्याला दुसऱ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली, याचे श्रेय ती फक्त विभालाच देत होती. त्यामुळे ती विभाच्या भावनांचा खूप आदर करत होती.

एके दिवशी विस्मिता म्हणाली की, तिच्या ऑफिसमधील मॅनेजर राजसला दुबईला नोकरीची ऑफर आली आहे आणि तो दुबईला निघाला आहे. एका वर्षाच्या आत राजसला कंपनीने बंगला, गाडी दिली. तो व्यवस्थित कामावर स्थिरावला. एके दिवशी राजसच्या आईने विभाला फोन केला, म्हणाली, "आम्ही तुमच्या विस्मिताला सुनेच्या रूपात आमच्या घरात लक्ष्मी म्हणून आणू इच्छितो." विस्मिताला राजस आवडतो हे विभाने तिच्या बोलण्यावरून अनेकदा जाणले होते. विभा आणि विभवने आपल्याकडे जे काही होते ते अगदी मुक्तहस्ते खर्चून आपल्या लाडक्या कन्येचे अगदी धूमधडाक्यात लग्न लावून दिले.

विस्मिता सासरी गेली आणि विभा-विभवला तिचा रितेपणा जाणवू लागला. काही दिवसांत विस्मिता दुबईला जाऊन आपल्या संसारात रमली. विभाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला. तिला तिथे काही दिवसांतच चांगली नोकरीही मिळाली. विभाला शेजारी-पाजारी म्हणायचे, "मुलगी परदेशात, तुम्हाला आराम नसला तरी जवळपास म्हातारपणी मायेचा माणूस हवा." पण विस्मिताचे सासू-सासरे मायेने विचारपूस करायचे, कधी बाहेर फिरायला घेऊन जायचे. विस्मिता आणि राजस दोघे आपल्या माता-पित्यांना वेळोवेळी पैसे पाठवायचे. रोज फोन करून माता-पित्यांची खबर घ्यायचे. विस्मिताला एके दिवशी फोनवर बोलता बोलता विभाचे मन समजले, म्हणाली, "अगं आई, आम्ही काही जास्त दूर नाही. मनाने नेहमीच आपल्याच आसपास असतो. दुबई काय इतकी दूर नाही. विमानात बसून काही तासातच गोव्यात पोहोचतो की!" 

विभाला आपल्या लाडक्या कन्येचे म्हणणे पटले.

तिला आपल्याला मुलगा नाही याचे दुःख अजिबात होत नव्हते. उलट ती आता आनंदात होती. जीवाला जीव देणारी आपली कन्या आणि मुलाच्या मायेने सांभाळणारा जावई, यामुळे आता विभाच्या जीवनातील सर्व कष्ट, चिंता मिटल्या होत्या. आता तिने बागकाम, मुक्या जनावरांची सेवा तसेच वाचन-लेखनात स्वतःला वाहून घेतले होते. तिच्या मनाच्या बगीच्यातील झाडा-वेलींना बहर आला होता. तो सुगंध तिच्या मुखकमळावर पसरला होता. बगीच्यातील त्या विहिरीजवळच्या बहरलेल्या जाईच्या वेलाचा सुगंध चारी दिशांनी पसरला होता.


 शर्मिला प्रभू 
आगाळी, फातोर्डा-मडगाव, 9420596539