पालकांच्या वादविवादांचा, संवादांचा किंवा त्यांच्या गूढ शांततेचाही मुलांच्या कोवळ्या मनावर खोल परिणाम होत असतो आणि बहुतेक वेळा, तो परिणाम न बोलता होतो.
खरं सांगा, आपण लहानपणी घरात पालकांमध्ये जोरात झालेला वाद किंवा भांडण ऐकलं की काय वाटायचं? खिडकीतून दिसणारी झाडंही एकदम स्तब्ध व्हायची, आणि आपण मात्र, पुस्तकाच्या पानांमध्ये डोकं खुपसून, “हे माझं काही नाही, मी इथे नाहीच...” असं स्वतःला समजावत बसायचो. हो की नाही?
मला अजूनही आठवतं, आमच्या शेजारच्या मीनाताई, ज्या एरवी त्यांच्या नवऱ्यावर ‘आपला नवरा कसा असावा’ ह्या विषयावर जणू पीएच. डी. च वाचून दाखवत, त्या एक दिवस संध्याकाळी दारात थांबून माझ्या आईला म्हणाल्या, “अगं, कालच्या भांडणाचा काही संबंध नव्हता गं बाळाशी. पण त्याच्या चेहऱ्यावर आज शाळेतून परतताना काही वेगळाच भाव होता...” आणि हाच आहे आपला आजचा मुद्दा. पालकांच्या वादविवादांचा, संवादांचा किंवा त्यांच्या गूढ शांततेचाही मुलांच्या कोवळ्या मनावर खोल परिणाम होत असतो आणि बहुतेक वेळा, तो परिणाम न बोलता होतो.
वाद आणि बालमन – एक सूक्ष्म खेळ
पु. लं. म्हणत असत, ‘घर म्हणजे माणसाच्या भावनांची एक घमासान रंगभूमीच असते.’ खरंच, दाम्पत्य जीवन हा केवळ एक लग्नाचा करार नसतो, तर एक मानसिक, भावनिक जिव्हाळ्याचा प्रवासही असतो. आणि जेव्हा दोन व्यक्तींच्या भावना एकत्र नांदतात, तेव्हा मतभेद अपरिहार्यच. पण हे मतभेद कसे हाताळले जातात, ह्याचा ठसा मात्र त्यांच्या मुलांच्या अंतरंगात खोलवर उमटला जातो.
अहो, मुलं संवेदनशील असतात. त्यांना मोठ्यांसारखं ‘डिटॅच’ होता येत नाही. त्यामुळे आई-बाबांच्या लहानसहान वाक्यप्रचाराचाही अर्थ ते आपल्या भाषेत लावतात. “आई रडली म्हणजे मी वाईट वागलो?”, “बाबांनी दार आपटून घेतलं म्हणजे ते मला रागावले का?” असं असताना पालक म्हणून आपलं भान राखणं, हे ‘योग्य पालकत्व’ नाही, तर ‘सजग पालकत्व’ ठरतं.
उदाहरणार्थ, एका सेशनला एक जोडपं आलं होतं. दोघंही सुशिक्षित, सुसंस्कृत. पण आपल्या पौगंडावस्थेतील मुलीच्या वागणुकीत ‘अचानक बिघाड’ झाल्याने चिंतेत दिसत होते. थोडं बोलत गेल्यावर लक्षात आलं की घरात गेल्या वर्षभरात एक शब्दही न उच्चारता विचित्र वाद चालू होता. हो, अगदी कोल्ड वाॅरच जणू! ती गूढ शांतता, ती न बोलली जाणारी असंख्य वाक्ये जी कोणत्याही नवऱ्याला “काय कटकट आहे...” असं म्हणायला भाग पाडतात, आणि कुठल्याही बायकोला “सांगून काही उपयोग नाही” असं वाटायला लावतात. असं सगळं त्या घराच्या हवेत तरंगत होतं.
आणि त्यांची मुलगी त्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेत होती. “आई-बाबा एकमेकांशी बोलत नाहीत म्हणजे मीच काहीतरी चुकीचं केलं का?” ह्या निष्कर्षापर्यंत तिची छोटी निरागस मनोवृत्ती पोहोचली होती ज्यामुळे ती खूप गोंधळून गेली होती. तिला तिची उत्तरं न मिळाल्यामुळे त्या गोंधळलेल्या अवस्थेत ती आणखीनच निराश होत होती आणि अबोल झाली होती. चिडचिड करत होती.
ह्यात दोष नक्की कोणाचा?
पालकत्व हा ‘परफॉर्मन्स’ नाही, तो एक प्रभाव असतो. आणि हा प्रभाव पक्का होतो आपल्या दैनंदिन कृतीतून. आपण सुदृढ संवाद साधतोय का? वाद नीट मिटवतोय का? किंवा फक्त ‘प्रेझेन्स’ देत आहोत? मुलांच्या मनाचा आलेख कळणं कठीण असतं अशा परिस्थितीत. एकदा एका मनोविश्लेषण सत्रात एका लहानग्याने चित्र रंगवताना मला म्हटलं, “दीदी, हे आमचं घर आहे. हे बाबा. ते टी.व्ही. बघतायत. आई स्वयंपाकघरात आहे. आणि मी... मी बाहेर खेळतोय.”
मी विचारलं, “तुम्ही सगळे घरात का नाही रे?”
तो म्हणाला, “घरी मी असलो तरी तिथे कुणी माझ्याशी खेळत नाही, आई बाबा बोलतच नाही, काय करु?”
त्यादिवशी त्या चिमुकल्याची ही वाक्ये काही काळ माझ्या कानात रुंजी घालत राहिली. पालकांच्या भावनिक उपस्थितीचा अभाव किती असहायता आणि नैराश्य निर्माण करू शकतं हे ह्यावरूनच कळतं.
अगं, मग हा गुंता सोडवायचा कसा?
नवरा बायको म्हणून आपण एकमेकांशी भांडण करू शकतो, पण एकमेकांचा अपमान न करता. आपण एखाद्या दिवसासाठी गप्पही बसू शकतो, पण मुलांना गोंधळात न ठेवता. मुलं परिपूर्ण पालक नाही, प्रामाणिक माणसं पाहतात. त्यांना कधीकधी हे दाखवणंही आवश्यक असतं की माफ करणं, समजून घेणं, आणि एकत्र वाढणं ह्यातच आयुष्याची खरी ताकद आहे.
शेवटी एवढंच म्हणेन मी, वाद, शांतता, संवाद या सर्वातून पालकांची स्वतःच्या भावना समजून घेण्याची प्रक्रिया सुरु होते तेव्हाच आपण एकमेकांना आणि स्वतःला पुन्हा नव्याने समजून घेऊ शकतो. आणि या प्रक्रियेतूनच सजग पालकत्व उगम पावते, जिथे आपण मुलांना आदर्श देत नाही, तर प्रामाणिकता देखील शिकवतो.
लक्षात ठेवा, तुमच्या घरातली सुदृढ शांतता जिथे मुलांच्या मन:शांतीला योग्य ते खतपाणी घालते, तीच खरी ‘आयडियल फॅमिली’ असते. आणि ही शांती केवळ भांडण न होण्यात नसते, तर भांडणानंतर एकमेकांच्या मनापर्यंत पोहोचण्यात असते.
मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४