श्रीमंती हृदयात असावी, खिशात नव्हे!

पैसा म्हणजेच जीवन, पैसा म्हणजेच आयुष्य, पैसा म्हणजेच सर्वकाही - मग अशी श्रीमंती हृदयात का नाही?

Story: ललित |
23rd May, 10:08 pm
श्रीमंती हृदयात असावी, खिशात नव्हे!

आजच्या या आधुनिकतेच्या काळात ज्याच्याकडे पैसा आहे, तोच श्रीमंत मानला जातो. अन्य सर्वजण अर्थहीन ठरतात. याच विचारावर आज जग चालते. पण अशी श्रीमंती काय कामाची? पैसा असलेला माणूस श्रीमंत ठरतो, पण हृदयाची खरी श्रीमंती आज हरवत चाललेली आहे. स्वतःकडे जास्त पैसा आहे त्यामुळे समाजात मला जास्त मान आहे, कारण मी श्रीमंत आहे असा कलंक लावून फिरणाऱ्या लोकांचे जीवन खरोखरच शून्य असते. ही पैशांची नशा माणसाला इतकी आंधळी करते की, त्याला आपल्या सभोवतालच्या माणसांच्या भावनांचा आणि गरजांचा विसर पडतो. त्यांच्यासाठी मानवी संबंधांपेक्षा पैशाचे मोल अधिक महत्त्वाचे ठरते, ज्यामुळे ते एकाकी पडतात आणि त्यांच्या आयुष्यात खरी पोकळी निर्माण होते.

अर्थहीन ते नसतात, ज्यांच्याकडे पैशांची श्रीमंती नसते; पण अर्थहीन ते असतात ज्यांच्याकडे पैशांची श्रीमंती असते. अशा लोकांना वाटते की फक्त 'पैसे असणे' म्हणजेच खरी श्रीमंती. पण खरोखर असे असते का? कदाचित याचे उत्तर 'नाही' असेच असू शकते, कारण पैशांनी सर्व काही साध्य होत नाही. जरी श्रीमंत माणसांना पैशांमध्ये स्वतःची श्रीमंती दिसत असली, तरी समाजाला, सामान्य माणसाला तो देखावाच आणि गर्व वाटतो. कारण अशा श्रीमंतीचा कलंक लावून फिरणारी माणसे फक्त बाहेरून श्रीमंत असतात, पण मनाने अगदी भावनाहीन असतात. पैशांमध्ये श्रीमंती, आणि खिशामध्ये ताकद आहे, असे जरी त्यांना वाटले तरी जीवनाच्या प्रवासात ती माणसे अर्थहीन ठरतात. ही पोकळ श्रीमंती त्यांना क्षणिक सुख देऊ शकते, पण जीवनातील खरी आनंद आणि समाधान कधीच देऊ शकत नाही.

सुखमय जीवन जगतात ती माणसे, जी स्वतःकडे जे आहे त्यातच समाधान मानून जीवन जगतात. पैशांची कमतरता असली, तरी हृदयातून मात्र श्रीमंत असतात आणि निश्चितच मोठेपणाचा गर्व न बाळगता 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या मार्गावरून चालतात. हीच खरी श्रीमंती आहे जी नात्यांना जोडते, माणुसकी वाढवते आणि समाजाला अधिक सधन बनवते. असे लोक केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही जगतात, त्यांचे दु:ख वाटून घेतात आणि त्यांना मदतीचा हात देतात. त्यांच्या कृतीतून प्रेम, करुणा आणि सहकार्य यांसारख्या मूल्यांचे दर्शन घडते, जे पैशांनी कधीही विकत घेता येत नाही.

आज जग धावपळीच्या युगात चालते. त्यामुळे मोठेपणा, श्रीमंती यांना जास्त महत्त्व दिलेले दिसते. पण खरंच याची गरज आहे का? अशा श्रीमंतीच्या मोठेपणातून फक्त गर्व निर्माण होतो. पण त्याच्या मनाच्या श्रीमंतीचे काय? कारण अशी माणसे मनातून श्रीमंत नसतील, तर त्यांना जीवनाच्या मार्गावर विजय मिळविणे कठीणच असते. माणुसकीचा ओलावा नसलेल्या श्रीमंतीला कधीही खरी किंमत नसते, ती केवळ एक दिखावा ठरते. अशा व्यक्तींना खरे मित्र आणि हितचिंतक मिळत नाहीत, कारण त्यांचे संबंध केवळ पैशांवर आधारित असतात.

श्रीमंतीचा विजय हा खरा सामान्य लोकांच्या माणुसकीत लपलेला असतो. पैशांनी माणूस श्रीमंत होतोच, पण खरी श्रीमंती ही त्याच्या मनातच असली पाहिजे. आजच्या काळात खिशात श्रीमंती भरून फिरणारे अनेक लोक भेटतात. पण त्याच श्रीमंतीने दुसऱ्याला मदतीचा हात द्यायला मागे सरकतात, आणि हीच आजच्या काळाची शोकांतिका आहे. गरजूंना मदत करण्याची वृत्ती, संकटात सापडलेल्यांना आधार देण्याची भावना आणि सर्वांशी समानतेने वागण्याची माणुसकी हीच खरी श्रीमंती आहे, जी जीवनात चिरकाल टिकते.

त्यामुळे, खरा श्रीमंत तोच ज्याला पैशाची आस नसते; पण हृदयात माणुसकीची श्रीमंती असते. आजच्या या घडीला पैशांशिवाय सर्व निरर्थक आहे, हे खरे आहे. परंतु जर आपण त्या पलीकडे पाहिले, तर हृदयातील श्रीमंतीला वाव देणे तितकेच महत्त्वाचे असते. खिशातील श्रीमंती माणसांना लुटण्याचे साधन ठरते, पण हृदयातील श्रीमंती जीवनात असहाय्यांना आधार देत असते. तिचे मोल पैशांपेक्षा कितीतरी अधिक असते. त्यामुळे - श्रीमंतीतून जग जिंका, खिशातील गर्वाने नाही.


- पूजा भिवा परब, पालये, पेडणे