ऐतखाऊ बाळूशेट

तसा त्रास नव्हता त्याचा कोणाला. स्वभावाने चांगला, कधी कधी शेजाऱ्यांनाही मदत करत असे. घरातही अगदी दीनवाणेपणाने राहत असे. नाही म्हणायला चांदीचे वेढे कर, साखळी कर अशी कामे करायचा तो, पण त्यात काय घर चालणार? आमच्या वाड्यावर वाटेवरच घर त्याचे. सकाळी सकाळी त्याच्या घरातून गाण्याचा आवाज आला की समजायचे की आज बाळूशेट कामात आहेत म्हणून.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
23rd May, 10:05 pm
ऐतखाऊ बाळूशेट

काही माणसे या पृथ्वीवर एक वरदान घेऊन आलेली असतात, ऐतखाऊ म्हणून. अर्थात हे वरदान आहे की शाप, याबद्दल दुमत नक्कीच होईल. पण माझ्या मते तरी वरदानच. बघा ना कसे मस्तमौला राहतात हो ही मंडळी, राग नाही, लोभ नाही, काम नाही, धंदा नाही. अगदी मस्त आयुष्य जगतात. आणि लोकही त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाहीत. कारण त्याला काही येत नाही आणि तो ऐतखाऊ आहे, याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्रही शंका नसते. आहे की नाही हे वरदान? कोडगेपणा तसा कोणालाही जमत नाही, तो एक गुण आहे, त्या प्रकारात हे लोक मोडतात. पण मजेत जगतात हो दुसऱ्यांच्या जीवावर. कोणाचे काही पडलेले नसते त्यांना. आज मी अशाच एका नमुन्याचे व्यक्तीचित्रण करणार आहे. म्हटले तर खरे, म्हटले तर काल्पनिक.

तर इतर सर्व गावांप्रमाणेच आमच्या गावातही अठरापगड जातीचे लोक राहत. अर्थात अजूनही राहतात. पण त्यातील अनेकांनी परंपरागत व्यवसाय सोडून नोकरी-धंदे चालू केले, असो! तर अशा ह्या आमच्या गावात अनेक लोक पिढ्यानपिढ्या नांदतात. असाच एक बाळूशेट, आमच्या गावातील सुवर्णकार अर्थात सोनार. गोव्यात सोनाराला शेट असे संबोधतात. म्हणून बाळूशेट. पिढ्या गेल्या बाळूशेटच्या सुवर्ण कारागीर म्हणून. बाळूशेटचे वडील शिवरामशेट मूळचे बाजूच्या गावातील. पण काही घरगुती कारणाने ते आमच्या गावात आले व आमच्याच नातेवाईकांच्या घरात भाड्याने राहू लागले. पण बाळूशेटचे आयुष्य मात्र आमच्याच गावात गेले. शिवरामशेट खरा कसबी कारागीर, पण अल्पायुषी ठरला. आपली पत्नी, तिला आम्ही बाळाई म्हणायचो, तिला आणि पदरी एका मुलाला टाकून तो गेला तो परत न येण्यासाठीच. बाळू एकुलता एक. बाळाई घर चालवण्यासाठी खूप कष्ट घेई. कोणाचाही आधार नसताना मुलाला लाडाकोडात वाढवले. अर्थात अनाथ असल्याने म्हणा किंवा अतिलाडाने म्हणा किंवा उपजत गुण म्हणा, बाळू मात्र अगदीच ऐतखाऊ निघाला. थोडी शाळा शिकल्यानंतर आईने त्याला सोनारकाम करायला ठेवले. पण तेही त्याला जमत नव्हते. बाळू शिकल्यावर अनेक जण येत उमेदीने काही नग करायला. पण बाळूशेटला वेळ होता कुठे गप्पांपुढे? नुसते गावभर भटकणे, फुकटचे खाणे आणि कंटाळा आला की मग काय होतेच सावर्डे. बरे, बसमध्ये त्याला तिकीटसुद्धा कोणी विचारत नसे. आमच्याकडून तिकिटाचे आठ आणे हक्काने मागणारा कंडक्टरसुद्धा, "तो आणि किती दितलो माती?" असेच म्हणून पुढे जात असे. अर्थात कोडग्या बाळूशेटला ते लागतही नसे. आई खूप समजवायची त्याला, पण उपयोग नव्हता. शेवटी सुधारेल म्हणून त्याचे लग्न लावून दिले. गरिबाघरचीच पण जातवाली मुलगी, स्वभावाला चांगली, कष्टाळू. बाळाई खूश झाली. आता तरी पोरगा सुधारेल, व्यवसाय करेल, वेडी आशा तिला. पण शून्य, उलट अशी बायको असणे त्याच्या पथ्यावरच पडले. अजून मोकाट सुटला तो.

तसा त्रास नव्हता त्याचा कोणाला. स्वभावाने चांगला, कधी कधी शेजाऱ्यांनाही मदत करत असे. घरातही अगदी दीनवाणेपणाने राहत असे. नाही म्हणायला चांदीचे वेढे कर, साखळी कर अशी कामे करायचा तो, पण त्यात काय घर चालणार? आमच्या वाड्यावर वाटेवरच घर त्याचे. सकाळी सकाळी त्याच्या घरातून गाण्याचा आवाज आला की समजायचे की आज बाळूशेट कामात आहेत म्हणून. गाणे पण एकच, "नाम तुझे घेता देवा होई समाधान", त्या पण दोन-तीनच ओळी. त्याच्या ह्या धरसोड वृत्तीमुळे त्याला सोन्याचे काम कोणी देतही नसे. बाळूशेटची पत्नी मात्र खूप मेहनती. आपला नवरा काय चीज आहे ते ती समजून चुकली होती. पण दोष न देता स्वतः सासूप्रमाणे कष्ट करी. कोणाचे पापड, लोणची करून दे, रानपी म्हणून काम कर, चालू तिचे. पण एक, कधीच कोणाच्या दारात गेली नाही, कोणाजवळ तक्रारही केली नाही. दोन मुले तिला. बाळूशेटने बाकी काही नाही, पण ही एक भेट दिली होती तिला. कधी कधी घरात तंगी असे. पेजेवर निवारा होई, पण बाळूशेटला ना फिकीर. घरी पेज असेल तर सरळ बनियानवर आमच्या घरी यायचा आणि हक्काने जेवायला मागायचा. आईनेही त्याला कधीच नाही म्हटले नाही. आई न कंटाळता त्याला उमेदीने वाढायची. का वाढणार नाही? तो अजीजीच अशी करायचा की दगडसुद्धा मऊ होईल. या बाबतीत मात्र तो खूप हुशार होता. विडीची सवय होती त्याला, पण कधीच त्याने आपल्या पैशाने ओढली नाही. अर्थात पैसेही नसायचे म्हणा. कायम दुकानाबाहेर उभा. कोणी आला की धरायचा. बिडीबंडल मागायचा. लाजही नव्हती, शेवटी द्यायचे लोक.

घरादाराबाबत एकंदरीत बेफिकीर असणारा बाळूशेट दर सोमवारी मात्र शंकराच्या देवळात असायचा दिवसभर. काय मागायचा कोणास ठाऊक. कदाचित सात जन्म असेच आयुष्य मिळावे असे मागत असावा. असो! सगळा गाव नाव ठेवत असे. अर्थात आम्हीही अपवाद नव्हतो त्याला. तो समोर दिसला तर वाट वाकडी करत असू आम्ही. पण तरी हक्काने यायचा. जेवण नाही तर वाटीभर हुमण तरी. माझे लग्न ठरले. हळद होती त्या दिवशी. बरोब्बर दुपारी जेवायच्या वेळी आला. त्याच्या येण्यात नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता. शांत वाटत होता. सरळ माझ्याकडे आला आणि, "बाय ते माझे", म्हणत माझ्या हातात गुलाबी कागदात गुंडाळलेली एक पुरचुंडी दिली आणि सरळ निघून गेला. बाबा बोलवायला गेले, पण थांबला नाही. मी पुरचुंडी उघडली, पाहते तर काय आत छोटीशी मूर्ती होती लक्ष्मीची, चांदीची. क्षणभर डोळे पाणावले. मी खरं सांगते हे, आजही ती मूर्ती ठेवली मी जपून.

तर असा हा बाळूशेट. माहेरी गेली की गप्पांच्या ओघात विषय निघायचा त्याचा. एक मात्र बाळूशेटच्या पत्नीचे कष्ट म्हणा, शंकराची उपासना म्हणा, मुले मात्र चांगली निघाली. आणि असल्या बापाला त्यांनी सांभाळलेही चांगले. एक बिनधास्त, आत्मकेंद्री आयुष्य जगला बाळूशेट. सगळे असून कशातच नसणारा, संसाराच्या चाकोरीत कुठेही न बसणारा, असा हा बाळूशेट शेवटपर्यंत त्याच्या हिशेबात जगला व गेला, हे ही नसे थोडके...


- रेशम जयंत झारापकर, मडगाव