इतवार

खरेतर, चांगली कलाकृती कधीच एक असा ठोस संदेश देत नाही. ती केवळ एक प्रवास दाखवते, आपापले थांबे आणि अंतिम टप्पा ज्याच्या त्याने गाठायचा असतो. याही लघुपटाबद्दल तेच जाणवले.

Story: आवडलेलं |
31st May, 12:41 am
इतवार

मला आठवतेय शेवटचा पेपर देऊन घरी आले, की त्या दिवशी मी आईला अगदी ठणकावून सांगायचे, “मी उद्या खूप वेळ झोपणार आहे, मला आजिबात उठवायचे नाही!”. आईही हसून हो म्हणायची. दुसऱ्या दिवशी मात्र मीच सगळ्यांच्या आधी, अभ्यासाच्या नेहमीच्या वेळेला उठून बसलेली असायचे! सुट्टीच्या दिवशी आपण काही ठरवले, की काहीनाकाही अडचण येतेच आणि आपले सगळे बेत रद्दच होतात हा अनुभव त्यानंतरही बऱ्याच वेळा आला.

त्या वयात हे तसेही हसण्यावारीच घेतले जायचे. सुट्टी साजरी करायचे खरे नियोजन सुरू झाले ते नोकरी करायला लागल्यावर. आठवडाभर घडाळ्याच्या तालावर नाचता नाचता रविवारचीच वाट बघितली जायची. खरेतर, रविवार मस्त आरामात घालवायचा असायचा, या दिवसाचा पुरेपूर आनंद लुटायचा असायचा. शनिवार संध्याकाळपासूनच, ‘उद्या नक्की काय काय मज्जा करायची?’ हा विचार डोक्यात रुंजी घालायला लागायचा. हा विचार सुरुवातीला सुट्टीचे नियोजन, आराम, घरातली कामे याभोवतीच गुंफलेला असायचा. हळूहळू मात्र माझ्या लक्षात आले, की आपल्याला सुट्टी साजरी करायचे चक्क दडपण येऊ लागले आहे! आणि नुसते इतकेच नाही तर आपल्या सुट्टीच्या दिवसाचे जे काही नियोजन आपण ठरवले आहे, त्यापेक्षा जरा काही वेगळे घडले की आपले सगळेच बिनसत जाते आहे. एखादी गोष्ट साजरी करण्याचे टेंशन कसे काय येऊ शकते? असा प्रश्न तेव्हा पडायचा, पण ते माझ्या नियंत्रणाच्या बाहेरच असल्यासारखे झाले होते. 

त्याच सुमारास माझ्या वाचनात एक लेख आला होता, लेखकाचे नाव, लेखाचे इतर तपशील आता आठवत नाहीत; पण त्यात लिहिले होते की आजकाल आपल्या आजूबाजूला भरपूर पर्याय आहेत. या पर्यायांचेच दडपण आपल्याला आलेले असते. उदाहरणार्थ आपल्याला बाहेर जेवायला जायचे असेल, तर अनेक पर्याय असतात; भारतीय, चायनीज, मेक्सिकन, इटालियन... त्यातही अनेक उपप्रकार असतात. मग त्यातून एक पर्याय निवडायचे आपल्याला दडपण येते. आपण अतिविचार करत राहतो. ‘आपण निवडलेला पर्याय योग्य असेल का?’ हा विचार आधी येतो आणि नंतर त्याची जागा ‘आपण दुसरा पर्याय निवडायला पाहिजे होता का?’ हा प्रश्न घेतो. थोडक्यात सांगायचे तर ही दडपणाची साखळी आपल्याभोवती विळखा घालत जाते. सुट्टीच्या बाबतीतही हेच होत होते, एकच दिवस मिळतो आणि त्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे एखादी जरी गोष्ट मनाविरुद्ध झाली की पुढचे सगळे नियोजन बिघडून जाईल अशी भीती वाटून चिडचिड व्हायची. ज्या अर्थी त्या लेखात हे सगळे उलगडून सांगितले होते, त्या अर्थी ती काही माझ्या एकटीची समस्या नाही हे माझ्या लक्षात आले. आणि हल्लीच प्रदर्शित झालेला एक लघुपट बघून त्या विचारावर जणू शिक्कामोर्तबच झाले. 

‘इतवार’ हा तो लघुपट. अनेकांचा हक्काचा, मजा करण्याचा दिवस. या दिवशी सगळे कसे मनासारखे झाले पाहिजे एवढीच अपेक्षा. पण कधीतरी काहीतरी छोटेसे काहीतरी मनाविरुद्ध घडते आणि चिडचिड सुरू होते. सगळे काही सुरळीत सुरू असतेही, घडलेल्या घटनेचा आपल्या दिनक्रमावर काही फारसा फरकही पडणार नसतो; पण त्यावेळी हे लक्षात येत नाही आणि माणूसच मुळात चिडचिडा असेल तर काही विचारायलाच नको. 

या लघुपटातला माणूसही असाच. चिडचिड्या स्वभावाचा. त्यात मुलाच्या भविष्याच्या चिंतेने ग्रासलेला आणि त्यामुळे अगदी लहानातल्या लहान गोष्टींनीही स्वतःला त्रास करून घेणारा. त्याच्या समस्येचा (मुलाचे भवितव्य) उपाय त्याच्याजवळ नाही, त्याच्या हातातही तो नाही आणि याच गोष्टीचा त्रास होऊन त्याला इतर कशातच आनंद सापडेनासा होतो. त्याच्या या मानसिक त्रासाचे पडसाद त्याच्या नात्यांवर तर दिसतच असतात पण त्याला या मानसिक त्रासाबरोबरच शारीरिक त्राससुद्धा होत असतो. 

एका निवांत रविवारी सुरू झालेल्या मॉर्निंग वॉकच्या दृश्यापासून या लघुपटाची सुरुवात होते. तिथे घडलेली एक किरकोळ घटना, कानावर पडलेले एक साधेसेच वाक्य या नायकाला अस्वस्थ करते आणि मग पुढे सगळ्याच गोष्टींची त्याला चीड यायला लागते. असाच दिवस पुढे जात असताना अनपेक्षितपणे त्याला त्याच्या मुलाच्या संदर्भात एक चांगली बातमी समजते. ती ऐकून त्याचे चिडचिडीच्या या टोकावर असलेले मन क्षणात आनंदाच्या त्या टोकावर पोहचते आणि सगळा नूरच बदलून जातो. आत्ता, अगदी दोन मिनिटांपूर्वी त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलेल्या गोष्टींचा त्याला होणारा त्रास नाहीसा होतो. त्याला नको वाटणाऱ्या गोष्टी अचानक हव्याशा वाटतात. त्याचे वागणे, बोलणे आणि देहबोली अशा रीतीने बदलते की आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळे गोंधळ, त्रास, त्रागा फक्त त्याच्या मनात होता का? आपल्या मन:स्थितिचा आपल्या वागण्यावर, देहबोलीवर किती आणि कसा प्रभाव पडतो हे बघणे विलक्षण होते. मनाचे खेळ म्हणतात ते काही फार वेगळे नसावेत. 

खरेतर, चांगली कलाकृती कधीच एक असा ठोस संदेश देत नाही. ती केवळ एक प्रवास दाखवते, आपापले थांबे आणि अंतिम टप्पा ज्याच्या त्याने गाठायचा असतो. याही लघुपटाबद्दल तेच जाणवले. यात अनेक पदर आहेत. आपल्या हातात नसलेल्या गोष्टींचे आपण घेत असलेले दडपण आणि त्यामुळे आपल्यावर आणि आपल्या जवळच्या माणसांवर होणारा परिणाम हा धागा माझ्या हातात आला. एखादी गोष्ट (भविष्यात) अमुक प्रकारे घडेल का नाही याचे दडपण घेऊन आजचा दिवस का बरे वाया घालवायचा? असा विचार करताना जाणवले, आपणही कुठे वेगळे काही करतोय? हेच तर करत असतो. यानिमित्ताने जयदीप जोशी यांचा एक शेर आठवला, 

जिथे नाही तिथे पोचू अशा दुर्दम्य इच्छेने 

जिथे असतो तिथेसुद्धा असू नाही शकत आपण...


मुग्धा मणेरीकर
फोंडा