सुट्टीचा अर्थ आता बदलला आहे. कोडिंग, अबॅकस, नृत्य, पोहणे, चित्रकला, भाषा क्लासेस या साऱ्या उपक्रमांचं मूल्य मान्य करतानाही, त्यांच्या अतिरेकामुळे मुलांना स्वतःसाठी, विचारासाठी, मनमुराद विश्रांतीसाठी वेळ उरत नाही. हेच का ते ‘बालपण’?
बालपणीची ती सुट्टी, आभाळभर मोकळं आंगण,
आता वेळेत बांधलेली ‘सुट्टी’ ही झाली शिक्षणाचं बंधन...”
एकेकाळी उन्हाळी सुट्टी म्हटलं की डोळ्यांपुढे आजोळचा गोड गोंगाट, गावच्या विहिरीत डुंबणं, आंब्याची चोरी आणि दुपारी आंब्याच्या सावलीत आजीच्या गोष्टींचा खजिना उलगडणं हे सारे आनंदाचे क्षण उभे राहत. सुट्टी म्हणजे मनमोकळा वेळ, मोकळं आकाश आणि मनमुराद मस्ती. ती एक अनौपचारिक शाळाच होती जिथे जीवनकलेचे धडे गिरवले जात, नात्यांची वीण घट्ट होत असे.
मात्र आजच्या काळात हीच सुट्टी म्हणजे करिअरची तयारी, स्पर्धा परीक्षा, कोडिंग क्लासेस, डान्स, ड्रॉइंग, फिटनेस — यांची भरलेली दिनचर्या. मुलांच्या पाठीवरचं दप्तर जरी उतरलं असलं, तरी वेळेचं दडपण मात्र शिल्लक राहतं. कारण स्पर्धा – ती शाळेच्या भिंतीबाहेरही थांबत नाही. पालकही या शर्यतीत मागे पडू नयेत म्हणून मुलांच्या सुट्टीचा तासवार ‘शेड्युल’ आखतात. या धावपळीत, मुलांना स्वतःचे छंद जोपासण्यासाठी, निसर्गात रमण्यासाठी किंवा साधे मित्र-मैत्रिणींसोबत खेळण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांच्या बालपणातील सहजता आणि निष्काळजीपणा कुठेतरी हरवून जातोय का, असा प्रश्न पडतो.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू झाल्यानंतर, अनेक ठिकाणी एप्रिल महिन्यातही वर्ग चालू असतात. जेव्हा उन्हाचा प्रचंड तडाखा असतो, तेव्हा वातानुकूलित नसलेल्या शाळांमध्ये मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. प्रचंड उष्णतेत शाळेत जाणे, थकून परत येणे, आणि त्यानंतर लगेच क्लासेसमध्ये धावपळ करणे हे मुलांसाठी खरंच आव्हानात्मक ठरते. ही काय ‘सुट्टी’ म्हणावी की ‘शिक्षा’? उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये मुलांना नैसर्गिकरित्या ऊर्जा कमी झालेली असते, अशावेळी त्यांच्याकडून अतिरिक्त अभ्यासाची किंवा ...क्टिव्हिटीची अपेक्षा करणे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
“मन विश्रांतीला शोधतं, पण यंत्रासारखं चालत राहतं सुट्टी असूनही थकवा वाढत जातो...”
सुट्टीचा अर्थ आता बदलला आहे. कोडिंग, अबॅकस, नृत्य, पोहणे, चित्रकला, भाषा क्लासेस या साऱ्या उपक्रमांचं मूल्य मान्य करतानाही, त्यांच्या अतिरेकामुळे मुलांना स्वतःसाठी, विचारासाठी, मनमुराद विश्रांतीसाठी वेळ उरत नाही. हेच का ते ‘बालपण’? मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेला आणि स्वतंत्र विचारांना वाव न मिळाल्यास, त्यांची सर्जनशीलता खुंटू शकते. प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकण्याचा आग्रह धरल्याने, मुलं केवळ माहिती गोळा करणारी यंत्रे बनत चालली आहेत, त्यांचे भावनिक आणि सामाजिक कौशल्ये विकसित होण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पालकांच्या अपेक्षा आणि “रिकामा वेळ म्हणजे वेळ वाया” हा दृष्टिकोन यामुळे मुलं सतत धावत राहतात. त्यांच्या आयुष्यात थांबणं म्हणजे मागे पडणं, असं वातावरण तयार झालं आहे. या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे आहे, कारण रिकाम्या वेळेतच मुलांच्या मनात नवनवीन कल्पना जन्माला येतात, त्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि ते स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. त्यातच आजच्या डिजिटल युगात ‘सुट्टी’ म्हणजे स्क्रीनसमोरचे तास – मोबाईल, टीव्ही, गेम्स, ज्यात विश्रांतीच्या नावाखाली मन अधिक थकून जाते आणि डोळ्यांवरही ताण येतो. बाहेरील मैदानी खेळ आणि सामाजिक संवाद कमी झाल्याने मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होतोय.
या साऱ्या गडबडीत सृजनशीलतेला वेळ उरत नाही. लेखन, वाचन, गप्पा, स्वयंपाक, शिवण, बागकाम, आजीकडून गोष्टी ऐकणं हे सारे जीवनसत्त्व हरवू लागले आहेत. हे केवळ मनोरंजन नसून, मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत. यातून मुले अनेक व्यावहारिक गोष्टी शिकतात, कुटुंब आणि समाजाशी जोडली जातात आणि त्यांच्या मनात सहानुभूती आणि आपुलकीची भावना वाढते.
शहरी आणि ग्रामीण मुलांच्या सुट्ट्यांमध्येही आता तफावत दिसून येते. शहरी भागात अॅक्टिव्हिटी बेस्ड व्यस्तता, आणि ग्रामीण भागात साधनांच्या अभावामुळे येणारी मर्यादित मजा, पण दोघांच्याही वाट्याला ‘मोकळेपणाचा अभाव’ येतो. ग्रामीण भागातील मुलांना नैसर्गिक वातावरणाचा फायदा मिळत असला तरी, आधुनिक सुविधा आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांच्या संधी मर्यादित राहतात, तर शहरी मुलांना संधी असूनही वेळेच्या बंधनांमुळे त्यांचा उपयोग करता येत नाही.
उन्हाळी सुट्टी ही मुलांच्या मनःशांती, सृजनशीलता आणि आत्मभानाचा काळ असायला हवा. यामध्ये काही वेळ मैदानी खेळ, पुस्तकं, जुन्या मित्रांशी गप्पा, घरकामात सहभाग यांसारखे अनुभव द्यायला हवेत. कारण हीच खरी ‘मुलांची गुंतवणूक’ असते त्यांच्या मनाच्या उभारणीसाठी. त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची, स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची आणि नवीन गोष्टी शोधण्याची संधी मिळायला हवी. सुट्ट्या केवळ पुस्तकी ज्ञानापुरत्या मर्यादित न राहता, जीवनातील विविध पैलू अनुभवण्यासाठी एक व्यासपीठ बनायला हव्यात.
सुट्टी ही स्पर्धेची झेप नसून, स्वतःशी संवाद साधण्याची संधी आहे. आज ती ‘असणं’, 'जपणं', ही खरी सुट्टीची ‘स्मार्ट प्लॅनिंग’ ठरेल! पालकांनी मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे न लादता, त्यांना त्यांच्या पद्धतीने सुट्टीचा आनंद घेऊ देणे आवश्यक आहे.
- पल्लवी उल्हास घाडी, हरमल