पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या पर्यटन व्यवसायाची 'अशी' झालीय अवस्था..

आंतरराष्ट्रीय पर्यटकांची जम्मू काश्मीरकडे पाठ; बहुतांश हॉटेल्सचे २०२६ चे बुकिंग रद्द

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
30th May, 01:50 pm
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या पर्यटन व्यवसायाची 'अशी' झालीय अवस्था..

काश्मीर : जम्मू-काश्मीर खोरं हे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखलं जातं. पण या नंदनवनाला देशाच्या स्वातंत्र्यापासूनच रक्तरंजित घडामोडींचा शाप मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्यटन व्यवसायाला मोठा हादरा बसला तो १९८९-९० नंतर. याच काळात दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये थैमान घातलं. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील चकमकी, काश्मीरमधील हिंदू पंडितांचं स्थलांतर, त्यानंतरही सुरू असलेल्या कारवाया, यामुळे १९९०च्या दशकात काश्मीरमधील पर्यटन जवळपास थंडावल्यासारखंच झालं. पण त्यानंतर मोदी सरकारने कलम ३७० रद्द केले. दरम्यानच्या कालावधीत काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यास बराच काळ गेला. येथे अनेक आर्थिक उपक्रम सुरू करण्यात आले. यामुळे काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली होती. काश्मीरमधला पर्यटन व्यवसाय बहरू लागला होता.

J&K's economy and tourism in peril after Pahalgam massacre - The Hindu

मात्र २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि पुन्हा जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला खीळ बसल्याचे चित्र तयार होत आहे. विदेशी पर्यटकांकडून २०२६ चे जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. 'इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर'चे प्रमुख दीपक मनवानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


मनवानी यांनी  दिलेल्या माहितीनुसार, इटलीसह जगभरातील अनेक देशातील पर्यटकांकडून जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू करायचे असेल तर विदेशात जाऊन एडवाइजरी हटवण्याची मागणी करायला हवी असे ते म्हणाले. हल्ल्याच्या घटनेने पर्यटक लवकर या भागात येण्यास तयार होणार नाहीत. त्यांचा आत्मविश्वास तयार होण्यासाठी अमरनाथ यात्रेचे सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित नियोजन करावे लागेल. अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडल्यास पर्यटकांचा आत्मविश्वास वाढेल असा अंदाज दीपक मनवानी यांनी वर्तवला आहे.

स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण
यात महत्त्वाचा सहभाग टूरिस्ट कंपन्यांचा असेल. त्यांनी ते पॅकेज व्यवस्थितरित्या तयार करावे लागेल. पर्यटन हाच काश्मीरला देशाच्या अन्य भागाशी भावनिकदृष्ट्या जोडणारा एकमेव दुवा आहे. सामान्य पर्यटकासाठी काश्मीर सुरक्षित करणं हे प्राथमिकतेनं घडायला हवं. अनेक वर्षांच्या अस्थिरतेनंतर अखेर सावरायला लागलेला जम्मू-काश्मीर भागातील पर्यटन व्यवसाय पहलगाम हल्ल्यानंतर आता पुन्हा ढेपाळण्याचा प्रकार दुर्दैवी आहे.  हजारो काश्मिरी माणसांचं घर पर्यटनावर चालतं. त्यामुळे ऐन हंगामात सहली रद्द होणं ही बाब गांभीर्याने विचार करायला लावणारी आहे.

हॉटेल उद्योगाला मोठा धक्का
कोरोना काळामुळे २ वर्षे ठप्प असलेला काश्मीरचा हॉटेल उद्योग अद्याप नीट उभा राहू शकला नव्हता. अशा परिस्थितीत आता दहशतवादी हल्ल्यानंतर हॉटेल बुकिंग रद्द होऊ लागले आहेत. 'गेली ५५ वर्ष राजबागमध्ये आम्ही पर्यटकांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करतो. खोऱ्यात दहशतवाद थैमान घालत होता, तेव्हाही पर्यटकांचा जीव धोक्यात येत नव्हता. पण या हल्ल्यात थेट पर्यटकांना लक्ष्य केलं गेलंय. त्या दिवसापासून पार मे अखेरपर्यंत आमच्याकडे असलेली सगळी बुकिंग्ज रद्द झाली आहेत. हा मोसम तर आता हातचा गेला' अशी खंत अनिता मेहता या व्यावसायिकेने बोलून दाखवली आहे. 

हेही वाचा