प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढते : परिवर्तनाचा निकाल मतदारांवरच
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगावचे नगरसेवक ते आमदार अशी राजकीय कारकीर्द असलेल्या दिगंबर कामत यांची मडगाववरील राजकीय पकड ३१ वर्षांपासून आहे. मडगावातील काही समस्या पुढे करून काँग्रेस, गोवा फॉरवर्डने उमेदवार उभे केल्यास लढत चांगली होईल; पण आकडेवरी पाहता सत्ता कुणाचीही असली व ते कोणत्याही तिकिटावर उभे राहिले तरी सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन कामत विजयी झाले आहेत. त्यामुळे परिवर्तनाची दोरी मतदारांच्या हातात राहणार आहे.
विधानसभा निवडणुका दीड वर्षांनंतर असल्या तरी मडगावातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. उद्योजक दत्ता नायक यांचे पुत्र चिराग नायक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून कामत यांना थेट आव्हान दिले आहे. बाबू नायक यांचे नातू प्रभव नायक यांनीही कामत यांच्यामुळेच मडगावातील समस्या वाढल्याची टीका वारंवार केली आहे. काँग्रेसकडून साविओ कुतिन्होही कामत यांना लक्ष्य करत आहेत. कामत यांनी मात्र, लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याचे सांगून आपणास मडगाववासीयांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत राजकीय धक्का कुणीही देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मडगाव म्हणजे दिगंबर कामत हे समीकरण ३१ वर्षांचे आहे. जनतेशी वैयक्तिक ओळख, त्यांना केलेली मदत, विरोधकांना न बोलता दिलेली चपराक व परिस्थितीनुसार कार्यपद्धती या बाजू कामत यांच्या राहिल्या आहेत. निवडणुका दूर असल्या तरीही कामत यांची तयारी नेहमीच असते. त्यामुळे काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्याकडून मिळणारे आव्हान व युवा नेतृत्वाकडून होणारी टीका याचा परिणाम कामत यांच्यावर होत नसल्याचे दिसत आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मडगावात पक्षाचा उमेदवार देणार असल्याचे बोलून दाखवले आहे. चिराग नायक यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशावेळी गोवा फॉरवर्ड समर्थकही उपस्थित असल्याचे दिसून आले होते.
कामत यांच्या मतांच्या संख्येत प्रत्येक निवडणुकीत वाढच झाल्याचे दिसून येते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण २२,३७२ मतदान झाले होते. त्यातील १३,६७४ मते कामत यांना मिळाली व ७,७९४ मतांनी ते काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. त्यांनी १९९९ पासून मंत्री म्हणून काम केले आहे. २००२ ते २००५, २००५ ते २००७ या कालावधीत ते मंत्री होते. शिवाय २००७ ते २०१२ या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. राजकारणातील मातब्बर असे ते खेळाडू आहेत. १४ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेस पक्षाच्या एक तृतीयांश आमदारांसह आमदार कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दिगंबर कामत यांनी १९८९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिली विधानसभा निवडणूक लढवली. त्यापूर्वी ते मडगावचे नगरसेवक होते. या निवडणुकीत त्यांना एकूण मतांपैकी ४७ टक्के म्हणजेच ५,९९५ मते मिळाली; पण त्यांचा पराभव झाला. १९९४ मध्ये मडगावातून १३ उमेदवार उभे होते. भाजपच्या तिकिटावर कामत यांनी ५,००९ म्हणजे ४० टक्के मते घेऊन विजय नोंदवला होता. १९९९ मध्येही कामत यांनी भाजपच्या तिकिटावर ७,५४९ मते मिळवून काँग्रेसच्या एम. के. शेेख यांचा पराभव केला. यावेळी मतांची टक्केवारी ५८ टक्के राहिली. २००२ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर ६५ टक्के म्हणजेच ८,५२५ मते मिळवून काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा पराभव केला होता.
२००७ मध्ये भाजप सोडलेल्या कामत यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून भाजपच्या शर्मद रायतूरकर यांचा पराभव केला. ५२ टक्के, म्हणजेच १७,४५५ पैकी ९,१९८ मते मिळवून मडगावात पक्ष बदलल्यानंतरही नागरिकांचा आपणास पाठिंबा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. २०१२ मध्येही कामत यांनी रूपेश महात्मे व साविओ कुतिन्हो यांचा पराभव करून २२,१७१ पैकी १२,०४१ मते म्हणजेच ५४ टक्के मते मिळवून मतदारसंघ राखला होता. २०१७ मध्ये पुन्हा भाजपने शर्मद रायतूरकर यांना उमेदवारी दिली; पण कामत यांनी २२,३६६ पैकी १२,१०५ मते म्हणजेच ५४ टक्के मते मिळवून मडगाववरील हक्क कायम राखला. २०२२ मध्ये भाजपने माजी मंत्री बाबू आजगावकर यांना मडगावातून उमेदवारी दिली होती. यावेळीही त्यांनी २२,३७२ पैकी १३,६७४ (६१ टक्के) मते मिळवून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. मडगाव मतदारसंघात ते कोणत्या तिकिटावर निवडणूक लढतात हे महत्त्वाचे नाही, तर कामत म्हणून ते निवडणूक जिंकत असल्याचे दाखवून दिले आहे.
बलस्थाने आणि कमकुवत बाजू
मडगावातील नागरिकांसाठी कोणत्याही वेळी उपलब्ध असणे, अडीअडचणीत त्यांना मदत करणे, अनेकांना नोकरीसाठी केलेली मदत याशिवाय लोकांची कामे होण्यासाठी काहीवेळा आउट ऑफ द बॉक्स जाण्याची पद्धत, गरीब असल्यास त्याच्यासाठी नियमांवर थेट बोट न ठेवणे, मोठी पदे भूषवली तरीही जनसंपर्क कायम राखणे ही आमदार कामत यांची बलस्थाने आहेत. मडगावातील पार्किंग प्रकल्प, अरुंद रस्ते, सांडपाणी प्रश्न, सोनसडोची समस्या, रखडलेले बसस्थानक, पालिकेतील कारभार, धोकादायक इमारती व मार्केट इमारत असे अनेक प्रश्न बाकी आहेत. याचा फायदा विरोधक घेत असून कामत यांच्यावर टीका करत आहेत. भाजपची सुमारे ७ हजार मते नेहमीच भाजपसोबत राहिली; पण आजगावकर उभे राहताच त्यात कमी आली. पुढील निवडणूक आमदार कामत भाजपमधून लढल्यास त्यांची बाजू आणखी मजबूत असेल.
दुरंगी लढत झाली तरच चुरशीचा सामना
विरोधकांनी बुथनिहाय तयारी केलेली नाही. काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी धुसफूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकांआधी येणार्या पालिका निवडणुकांच्या निकालावरही मडगावातील सत्ता कुणाच्या बाजूने जाणार याचा अंदाज घेणे सोपे जाणार आहे. त्यानंतर रणनीती बदलत जाऊ शकतात. लोकसभेत कमी झालेले मताधिक्य ही विधानसभा जिंकण्याची पायरी होऊ शकत नाही; कारण आकडेवारीनुसार मतदार नेहमीच कामत यांच्या बाजूने राहिल्याचे दिसून आले. कामत यांच्याऐवजी त्यांचे पुत्र योगिराज यांनी निवडणूक लढवल्यासही दिगंबर कामत पूर्ण ताकद त्याच्यामागे लावतील. त्यामुळे यावेळी परिवर्तनासाठी विरोधक एक होऊन एकच उमेदवार दिल्यास निवडणूक चुरशीची होऊ शकते.