घर दुरुस्ती, पार्टीशन नियम लवकरच नगरपालिकांना लागू

मुख्यमंत्री : ‘स्वयंपूर्ण गोवा २.०’अंतर्गत आभासी पद्धतीने पंचांशी संवाद


01st June, 12:04 am
घर दुरुस्ती, पार्टीशन नियम लवकरच नगरपालिकांना लागू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारने पंचायत खात्यांतर्गत घर दुरुस्ती परवाना ३ दिवसांत, तर पार्टिशन सर्टिफिकेट १५ दिवसांत देण्याचा नियम केला आहे. लवकरच हे नियम नगरपालिकांना लागू करण्यात येणार अाहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. शनिवारी त्यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा २.०’ अंतर्गत आभासी पद्धतीने राज्यभरातील पंच, सरपंच, स्वयंपूर्ण मित्रांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, कृषी, आरोग्य, तसेच शिक्षण क्षेत्रांतील विविध विषयांवर चर्चा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोमंतकीयांचा हॅपिनेस इंडेक्स वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘ईज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘ईज ऑफ डुईंग’ बिझनेस वाढवण्याची सरकारी सेवा सहजपणे मिळाव्यात यासाठी आम्ही काम करत आहोत. यासाठी पंचायत खात्यात नवे दोन नियम लागू करण्यात आले. तीन दिवसांत दुरुस्ती परवाना देण्याच्या निर्णयाबाबत आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. पंचायतींनीही याची त्वरित अंमलबजावणी केली. सुमारे ९५ टक्के पंचायतींनी तीन दिवसांतच असे परवाने दिले.
सरकार पंचायत खात्यांच्या नियमात चांगले बदल करत आहे. नुकतेच पार्टिशन सर्टिफिकेट १५ दिवसांत देण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. याबाबत सोमवार पासून अर्ज येणे सुरू होतील. यासाठी देखील
पंचायतींनी सहकार्य करणे आवश्यक आहे. याबाबत अर्ज आल्यास घराची विभागणी करून प्रमाणपत्र द्यावे. यामुळे भविष्यात एकाच घरातील व्यक्तींना स्वतंत्र पाणी आणि वीज जोडणी मिळणे सुलभ होणार आहे. नगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींसाठीही अशीच सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत पंचायतींनी सक्रिय राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले, मान्सून काळात पंचायत क्षेत्रात किंवा महामार्गावर पाणी साचून राहून अपघात होण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी पंच, सरपंच यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.याशिवाय नाल्यातील गाळ उपसणे, धोकादायक झाडे कापणे, परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेणे यासाठीही पंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
विकसित कृषी संकल्प अभियान
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने ‘विकसित कृषी संकल्प’ अभियान सुरू केले आहे. त्यानुसार २९ मे ते १२ जून दरम्यान नावाजलेले कृषी वैज्ञानिक विविध गावांना भेट देऊन तेथील माती परीक्षण करणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले....
डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊ नये यासाठी पंचायतींनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
टीबीबाबत जागृती करून रुग्णांचे समुपदेशन करावे.
पंचायत क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे.
धबधब्यांच्या ठिकाणी धोक्याच्या सूचना देणारे फलक लावावेत.