पत्रकारितेची कला ही ईश्वराची देणगी : केदार नाईक

मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकारांचा सन्मान


02nd June, 12:13 am
पत्रकारितेची कला ही ईश्वराची देणगी : केदार नाईक

सोहळ्यात गौरवण्यात आलेले पत्रकार महेश गावकर, देविदास गावकर, महादेव गवंडी आणि विलास महाडिक यांच्यासोबत मान्यवर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पत्रकारितेची कला ही ईश्वराची देणगी असते. प्रत्येकालाच पत्रकारिता करणे जमत नाही. लोकशाही मजबूत करण्यात पत्रकार, पत्रकारितेचा महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन साळगावचे आमदार केदार नाईक यांनी केले.
गोवा मराठी पत्रकार संघाचा प्रथम वर्धापनदिन रविवारी कला अकादमीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार केदार नाईक बोलत होते. वर्धापन दिनाच्या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू, उपाध्यक्ष सुरेश नाईक, सचिव सुभाष नाईक, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकार महादेव गवंडी आणि देविदास गावकर यांचा स्व. जे. पी. नायक स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पत्रकार विलास महाडिक यांचा स्व. नरसिंह प्रभू स्मृती पुरस्कार देऊन, तर महेश गावकर यांचा स्व. सीताराम सावळ स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकार/शासकीय यंत्रणांचा दबाव हे आजच्या पत्रकारितेसमोरी आव्हान आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून ठोस भूमिका पत्रकारांनी वाचकांसमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांनी मांडले. १९९० च्या सुमारास एकच वाहिनी होती. काही वर्षांनंतर, २००५ पर्यंत ५०० हून अधिक वाहिन्या सुरू झाल्या. आता इंटरनेट, यू ट्यूब, इस्टाग्राम यांचा वापर वाढत आहे. त्यामुळे या माध्यमांचा वापर करणारे एकाच गोष्टीकडे अधिक वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे १९९० सारखी पत्रकारिता आता चालणार नाही. सरकार वा सरकारी यंत्रणांना टीका, विरोधी लिखाण चालत नाही. नवीन आव्हानांना तोंड देत पत्रकारिता करण्याचे आव्हान पत्रकारांसमोर आहे, असेही सम्राट फडणीस म्हणाले.
गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू यांनी स्वागत केले. सुरेश नाईक यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. सुभाष नाईक यांनी आभार मानले. नितीन कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचाही गौरव
गोवा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचाही त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. पत्रकारिता ही समाजाभिमुख हवी. पत्रकारितेचा लाभ हा समाजासाठी झाला तर पत्रकारितेचा मूळ उद्देश साध्य होतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांनी व्यक्त केले.