'दर्या पल्तडी गोंय'! दाट धुकं, थंडगार वारा, फेसाळणारे धबधबे...

पावसाळी पर्यटनासाठी सरकारची मोहिम; मात्र अतिउत्साहींना आवर घालण्याची गरज

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd June, 10:53 am
'दर्या पल्तडी गोंय'! दाट धुकं, थंडगार वारा, फेसाळणारे धबधबे...

पणजीः जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्याची एक विशिष्ट संस्कृती आहे. गोव्यातील पर्यटन हे मुळातच बहुआयामी म्हणून गणले गेले आहे. धार्मिक, सांस्कृतिक पर्यटनासोबतच इथला निळाशार समुद्र, नद्या, धबधबे आणि हिरवीगार जंगले यांच्या रूपातला हिरवागार गोवा पाहण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात. मात्र काही कालावधीपासून वर्षभर चालणारे पर्यटन मान्सूनच्या आगमनानंतर काहीसे मंदावलेले दिसतेय.

पर्यटकांना गोव्यातील जलक्रीडांचा आनंद घेता यावा आणि विशेषतः 'मान्सून पर्यटनाला चालना देण्यासाठी' राज्याच्या पर्यटन खात्याने एअरलाईन्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांसोबत भागीदारी केल्याची माहिती समोर आली आहे. या उपक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील ग्रामीण भागातील निसर्गरम्य स्थळे आणि काही अपरिचित धबधबे पर्यटकांना दाखवण्यावर भर देण्यात येणार आहे.



'दर्या पल्तडी गोंय' या मोहिमेअंतर्गत पावसाळी, सांस्कृतिक उत्सवांवर भर देण्यात आला आहे. सांजाव, चिखल कालो आणि इतर स्थानिक सण-उत्सव यांचा यात समावेश आहे. या उपक्रमांतर्गत पर्यटन विभागाने एअरलाईन्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स आणि आदरातिथ्य संस्था यांच्यासोबत भागीदारी करून आकर्षक टूर पॅकेजेस आणि खास पावसाळी अनुभव त्यांच्यासमोर सादर केले. अधिकाधिक पर्यटक गोव्याकडे आकर्षित होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


20+ River Rafting Organizers in Goa - Best Adventure Organizers near me -  Justdial

वॉटर राफ्टिंगचा थरार
पर्यटकांना म्हादई नदीचा, दऱ्याखोऱ्यांत असलेल्या नैसर्गिक सौंदर्य पाहता यावे, यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळ व ब्रिटिश अॅडव्हेंचर स्पोर्ट्‌स यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तरीत म्हादई नदीच्या पात्रात 'वॉटर राफ्टिंग' या जलक्रीडेची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या गोव्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी दमदार पाऊस झाल्यानंतर सुरक्षेची काळजी घेऊनच 'वॉटर राफ्टिंग' ला सुरूवात होणार आहे.

पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावीत अशी ठिकाणे
चोर्ला घाट (Chorla Ghat)
पश्चिम घाटात दूरवर पसरलेला, चोर्ला घाट हा गोव्याला कर्नाटकशी जोडणारा धुक्याचा डोंगराळ मार्ग आहे. थंडगार हवा, आकार बदलणारे ढग आणि जंगलातील पायवाटा, लॉन्ग ड्राइव्हसाठी या स्थळाला पर्यटक पसंती देता


दूधसागर धबधबा, भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य

या धबधब्याकडे पाहिल्यावर शब्दशः अर्थाप्रमाणे भासणारा दुधाचा समुद्रच भासतो. कुळे येथून दाट भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यामधून जीप सफारीद्वारे दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी प्रवेश करता येतो. एका बाजूला डोंगर कपाऱ्यांमधून वाहणारा धबधबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड घनदाट वने आणि पाने -फुले, औषधी वनस्पतींनी वेढलेली जंगले, स्पाईस गार्डन असा सगळा निसर्गाचा पसारा दूधसागरच्या सभोवताली आहे. धबधब्याभोवती जैवविविधतेने समृद्ध असे भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान (Bhagwan Mahaveer Sanctuary and Mollem National Park) आहे, हे पाहण्यासाठी लोक हमखास जातात.

तांबडी सुर्ला धबधबा
प्राचीन तांबडी सुर्ला (Tambdi Surla) येथील धबधबा हा कदंब यादव वंश काळातील वास्तुकला शैलीच्या असणाऱ्या महादेव मंदिरापासून थोड्या अंतरावर असून या धबधब्याची तितकीशी प्रसिद्धी झालेली नाही. धबधब्यासोबतच जंगलाची सैर करण्यासाठी हे ठिकाण चांगला पर्याय आहे. घनदाट जंगल आणि समृद्ध वनस्पतींनी वेढलेले, हे स्थळ इतिहास, वारसा आणि सौंदर्याचे मिश्रण असून पावसाळ्यात सहलीसाठी योग्य आहे.

हरवळे धबधबा
डिचोली जवळील हा धबधबा त्याच्या विस्तृत प्रवाह आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखला जातो. जवळच रुद्रेश्वर मंदिर आणि हरवळे गुहा ही स्थळे देखील तुम्हाला पाहता येतात.

नेत्रावळी धबधबा
पश्चिम घाटात वाईल्डलाईफ सॅन्चुरी येथील नेत्रावळी धबधबा सर्व निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. मान्सूनमध्ये फिरण्यासाठी हे सर्वांत उत्तम स्थळ आहे. पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी आणि शांत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.


हुल्लडबाजांनो जरा आवरतं घ्या!
मान्सूनच्या सुरूवातीलाच राज्यभर पडलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. मात्र प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही जिल्ह्यातील धोकादायक धबधबे (Waterfall), खाणींचे खंदक, नद्या, तलाव आणि अन्य जलस्रोतांमध्ये नागरिकांनी प्रवेश करण्यावर आणि पोहण्यावर ६० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश जारी केले आहेत.

मागील काही वर्षांपासून धबधबे, नाले, तळ्यांमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असून २०२३ मध्ये सांगेतील मैनापी धबधब्यावर अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. पावसाळ्याच्या दिवसांत बहुतांश ठिकाणच्या धबधब्यांवर पाण्याचा प्रवाह वाढतो आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिक असतो. विशेषतः अशा पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजांना आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस (Police) प्रशासनासमोर असते. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय घेण्यात आला आहे.