मान्सूनच्या आगमनाने पिकांना फटका बसल्याचा परिणाम
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पावसामुळे कर्नाटक व महाराष्ट्रमधून येणारी आवक कमी झाल्याने पणजी बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी बाजारात टोमॅटोने पन्नाशी गाठली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचे दर १० रुपयांनी वाढून ५० रुपये किलो झाले. बटाटा ५ रुपयांनी वाढून ४५ रुपये किलो झाला. कांद्याचे दर ५ रुपयांनी वाढून ३५ रुपये किलो झाले, तर कोथिंबीरीची मोठी जुडी ४० रुपयांना होती. पालेभाज्यांचे दरही वाढले.
सोमवारी पणजी बाजारात मेथी ४० रुपये, तर शेपू ३० रुपये जुडी होती. पालक, तांबडी भाजीची एक जुडी प्रत्येकी २० रुपये होती. मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटकमधील टोमॅटो, कांद्यासह अन्य पिकांना फटका बसला आहे. पावसाने या उत्पादनांची वाहतूकही संथ गतीने होत आहे. यामुळे येथे पोहोचेपर्यंत माल खराब होत आहे. यामुळेही दरात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत टोमॅटो आणि कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
बाजारात वालपापडी दर्जानुसार १८० ते २०० रुपये किलो होती. गवारीचे दर ४० रुपयांनी वाढून १२० रुपये किलो झाले. ढब्बू मिरचीचे दर २० रुपयांनी वाढून १२० रू. किलो झाले. मिरची १०० रुपये किलो होती. शेवगा १६० रुपये किलो होता. फ्लॉवर ५० रुपये, तर कोबी ४० रुपयांना होता. लहान वांगी ६०, तर मोठी वांगी ८० रुपये किलो होती. गाजर, कारले आणि बीट ८० रुपये, तर काकडी ६० रुपये किलो झाली. दोडका ८० ते १०० रुपये, भेंडी ८० रुपये किलो होती.
बाजारात रानमेव्याची आवक कमी झाली आहे. काजू बिया ३०० रुपयांना १०० नग होत्या. मांगीलाल ६०० रुपये, तर हापूस आंबा ३०० ते ४०० रुपये डझन होता. फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवर भेंडी ५४ रु., कोबी २९ रु., फ्लॉवर ३५ रु. एक नग, गाजर ४६ रु., वालपापडी १३७ रु., मिरची ५४ रु., कांदा २६ रु., बटाटा ३५ रु., तर टोमॅटो ३६ रुपये किलो होता.