भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांची टीका
पणजीतील भाजप कार्यालयात राष्ट्रीय सरचिटणीस दुश्यंतकुमार गौतम यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : काँग्रेसच्या राजवटीत संविधानाचा सर्वाधिक वेळा अपमान झाला आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुश्यंतकुमार गौतम यांनी केली. केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त गोव्यात विविध ठिकाणी कार्यशाळा घेऊन यशस्वी कामगिरी सादर केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू असून, यानिमित्ताने भाजप कार्यालयात ‘संकल्प से सिद्धी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे मंत्री, आमदार आणि मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष दामू नायक यांचीही उपस्थिती होती.
दुश्यंतकुमार गौतम पुढे म्हणाले की, मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोव्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ‘आयुष्यमान भारत’सह अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचे काम जोरात सुरू आहे. यासाठी नोंदणी करण्यासाठीही जागृती मोहीम हाती घेतली आहे. २६ मे ते ११ जून दरम्यान या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. याचवेळी देशभरात पत्रकार परिषदांचे आयोजन करून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
गौताम यांनी सांगितले की, योग दिनानिमित्त १७ जून ते २० जून दरम्यान योगासंबंधी कार्यशाळाही भरवण्यात येणार आहेत. या निमित्ताने भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकजूट आणि सक्रिय सहभाग दाखविला आहे.
फोटो : पणजीतील भाजप कार्यालयात राष्ट्रीय सरचिटणीस दुश्यंतकुमार गौतम यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक.