सत्तरीतील उत्पादकांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता
पावसामुळे उतरवली न गेल्याने झाडावर लटकत असलेेली कोकम फळे.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : मान्सूनपूर्व पावसाचा कृषी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे कोकमची सोले व मिरची लागवडीवर परिणाम दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात मिरचीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कोकम सोले तयार करणाऱ्या उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे.
जूनच्या सुरुवातीला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कोकमची सोले उपलब्ध होत असतात. मे महिन्याच्या मध्यावर कोकमची फळे तयार होत असतात. ती काढून त्यावर प्रक्रिया करून कोकमची सोले केली जातात. कोकम सोलना बाजारपेठेत मोठी मागणी असते. सत्तरी तालुक्यात याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसाने कोकम सोल उत्पादनाच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजूनही झाडावर फळे दिसत आहेत. फळे काढून ती कडक उन्हामध्ये सुकविणे आता शक्य होणार नाही. मान्सूनपूर्व पावसाने अडचणी निर्माण केल्या आहेत. कोकम सोल तयार करणे शक्य नसल्यामुळे उत्पादकांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतही कोकमची सोले दिसणे कठीण होणार आहे. यामुळे कोकम सोलांचा दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
मिरचीवरही परिणाम
तालुक्यात मोठ्या प्रमाणात हिरवी मिरचीची लागवड केली जाते. यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे मिरची पावसात भिजून खराब झाली आहे. अनेकांचा उदरनिर्वाह या मिरची उत्पादनावर चालतो. यंदा मात्र पावसामुळे मिरची उत्पादनावर मोठे संकट ओढवले आहे.