जलवाहिन्यांच्या गोंधळामुळे तळगाववासीयांचे पाण्यासाठी हाल सुरूच

उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा शक्य : आमदार जेनिफर मॉन्सेरात यांची माहिती


25th May, 12:32 am
जलवाहिन्यांच्या गोंधळामुळे तळगाववासीयांचे पाण्यासाठी हाल सुरूच

मुख्य जलवाहिनीतून घरांना जोडणी देण्याचे काम करताना कामगार. (समीप नार्वेकर)
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जलवाहिन्यांबाबत गोंधळ निर्माण झाल्याने ताळगाववासीयांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. नव्या मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले, तरी काही घरांना अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. काही ठिकाणी जुन्या जोडण्या अद्याप मुख्य वाहिनीशी जोडल्या नसल्याने नळांना पाणी येत नाही. हे काम कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले असून त्याच्याकडून योग्य देखरेख होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
ताळगावमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जुन्या जलवाहिन्यांमध्ये सांडपाणी झिरपल्याने बोरभाट व व्हडले भाट परिसरातील नळांमधून दूषित पाणी येत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने पूर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. १५ मे रोजी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. बोरभाट ते कार्दोज वाडादरम्यान मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून बोरभाटात पाणीपुरवठा सुरू झाला आहे. व्हडले भाट भागात नवीन जोडण्या देण्याचे काम सुरू आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे हे काम लांबत आहे. त्यामुळे नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत.
दूषित पाण्याचा त्रास, टँकरची अडचण
व्हडले भाटमधील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बोरभाटात सांडपाणी झिरपत असल्याने तिथेच दूषित पाणीपुरवठा होत होता. या भागात संपूर्ण जलवाहिनी बदलण्यात आली आहे. मात्र, या कामामुळे अनेक घरांना जोडलेल्या जलवाहिन्या तुटल्या आहेत. त्या जलवाहिन्यांची माहिती अधिकाऱ्यांकडे नाही. पाण्यासाठी टँकर मागवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. टँकरसाठी बुकिंग केेले तरी लवकर पाणी मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, हे काम एका कंत्राटदाराला दिले होते. त्याने ते दुसऱ्या कंत्राटदाराकडे सुपूर्द केले. त्यामुळे कामात नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणा दिसून येत आहे.
९० टक्के काम पूर्ण; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत
आमदार जेनिफर मॉन्सेरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९० टक्के घरांना जोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारपासून सर्व घरांना सुरळीत पाणी मिळू लागेल. उर्वरित घरांचे जोडण्या देण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. पावसामुळे काही वेळ काम थांबवावे लागले होते. ओले रस्ते खणताना कामगारांना शॉक बसण्याचा धोका होता. शुक्रवारी भागातील तपासणी करण्यात आली असून सोमवारी शेवटची जोडणी देऊन पाणीपुरवठा सुरू केला जाईल.

हेही वाचा