नुकसानीबाबत २०९ तर पूर सदृश स्थितीबाबत ४ कॉल
पणजी : राज्यात चार दिवस पावसाने धुमाकुळ घातला आहे. २० ते २२ मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. यादरम्यान वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे घरावर अथवा वाहनांवर पडून नुकसानीच्या घटना घडल्या. सततच्या पावसामुळे राज्यात दरड, संरक्षक भिंत अथवा जुन्या इमारतीचे भाग कोसळून पडले. तर काही ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरले. २० ते २४ मेच्या सकाळी ७ वाजपर्यंत पावसाच्या संबधित आपत्तीसाठी २१३ कॉल आले होते. याचाच अर्थ दिवसाला सरासरी ५३ कॉल आले होते.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० ते २४ मे दरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत २०९ तर पूर सदृश स्थितीबाबत ४ कॉल आले होते. सर्वाधिक ८३ कॉल २१ मे रोजी आले होते. यानंतर २३ मे रोजी ७७, २२ रोजी ३४ तर २० मे रोजी १७ कॉल आले होते. वरील कालावधीत पावसामुळे १४.९७ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यादरम्यान सर्वाधिक ५.७२ लाख रुपयांचे नुकसान २२ मे रोजी झाले होते. तर २३ रोजी ५.०५ लाख व २१ मे रोजी ४.१५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
१५ दिवसात ८३.८० लाखांची मालमत्ता वाचवली
अग्निशामक दलाला वरील कालावधीत सुमारे ७२.०५ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. दलाने २२ मे रोजी ३९.४० लाख रुपयांची मालमत्ता वाचवली.दलाला एकूण २३२ कॉल आले होते. यातील २१३ कॉल (९१ टक्के) हे पावसासंबंधित होते. मागील १५ दिवसांची आकडेवारी पाहता दलाला ९ मे ते २३ मे दरम्यान ६३३ कॉल आले होते. यातील ३२९ पावसासंबंधित होते. दलाने १५ दिवसात ८३.८० लाखांची मालमत्ता वाचवली. तर या दरम्यान ३२.५४ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.