क्रीडा वार्ता : एशिया कपमधून टीम इंडियाची माघार; बीसीसीआयचा मोठा निर्णय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th May, 01:04 pm
क्रीडा वार्ता : एशिया कपमधून टीम इंडियाची माघार; बीसीसीआयचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने यंदाच्या एशिया कप क्रिकेट स्पर्धेतून भारतीय संघाला माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, ही माहिती आशियाई क्रिकेट परिषदेला कळवण्यात आली आहे.

महिला एशिया कपमध्येही जाणवणार भारताची अनुपस्थिती

स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग एशिया कपमध्येही भारतीय महिला संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष अशा दोन्ही स्तरांवरील आशिया स्पर्धांमध्ये भारत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानविरोधात ठोस पवित्रा

सध्या एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्षपद पाकिस्तानचे मंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडे आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणे हे देशाच्या भावनेविरोधात आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला असून, भारत सरकारच्या सल्ल्यानुसारच ही भूमिका स्वीकारण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

ब्रॉडकास्टर्सना बसेल आर्थिक फटका

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुष एशिया कप स्पर्धेत देखील बीसीसीआय संघ पाठवणार नाही. भारताशिवाय या स्पर्धेत पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघांचा सहभाग असतो. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यांशिवाय ही स्पर्धा पाहण्याचा उत्साह कमी होईल, असा अंदाज क्रिकेट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. तसेच ब्रॉडकास्टिंग क्षेत्रालाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचा हा निर्णय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून, त्यामागे स्पष्ट राजकीय आणि राष्ट्रीय धोरण आहे. पुढील काही दिवसांत एसीसीकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, एशिया कपच्या भवितव्याबाबत मोठे चित्र स्पष्ट होईल.