सहकारातून व्यवहार साधणाऱ्या पद्माताईं

कोविड काळात लॉकडाऊनमध्ये तर खूप फायदा झाला अनेकांना. सहकारे ताईंनी आता गोव्यातील तीन शहरात व्यवसाय विस्तारला आहे. एक सुपर मार्केटही सुरु केले आहे. सहकारी तत्त्वावर व्यवसाय करणारी उद्योजिका म्हणून ताईंचा गौरव होतोय सगळीकडे.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
16th May, 11:56 pm
सहकारातून व्यवहार साधणाऱ्या पद्माताईं

मिस्टरांच्या नोकरी निमित्ताने आम्ही परत एकदा गोवेकर झालो. मडगाव येथे स्थिरस्थावर व्हायला जरा वेळ गेला खरा. सरकारी कामे म्हणा ओळखीने झाली पण रोजच्या सामानाचे काय? मुंबईत कसे खाली उतरले की सगळे काही मिळायचे. सवय झाली होती. पण इकडे जरा वेगळा प्रकार.

हो आम्ही जेव्हा गोव्यात आलो त्या वेळी आता दिसतात तशी मारवाड्यांची दुकाने जागोजाग नव्हती. भाजीचे ही ग्रीन गाडे नंतर आले. काही आणायचे असेल तर डायरेक्ट मार्केट. अर्थात थोडी दुकाने होती बागायतदारसारखी पण घरापासून लांब आणि प्रचंड गर्दी. मला ह्या सुपरमार्केट प्रकारचे एक कळत नाही, कुठेही जा सामान घेण्यापेक्षा बिलिंगलाच जास्त वेळ लागतो. असो! 

असाच एकदा शेजारच्या राणेकाकुंशी बोलता बोलता विषय निघाला. काकू मोठ्या हौशी म्हणाल्या; "तुला सगळे सामान एकीकडेच घ्यायचे ना आणि रांग नको शिवाय घरपोच हवे ना चल तर मग!" संध्याकाळी काकुंबरोबर निघाले. तसे फार लांब नव्हते. एक लांबलचक खोली. आतमध्ये डाळ तांदुळाच्या गोणी, एक बाजूला घरघंटी, आणि बाहेर वाण सामानाच्या पिशव्या भरणे चालु. आम्ही आत शिरलो. समोरच एका खुर्चीत एक चष्मा घातलेले हसतमुख व्यक्तिमत्त्व बसले होते. काकूंनी ओळख करुन दिली, "ह्या सहकारे ताई. तुला जे हवे त्याची लिस्ट दे फक्त २ तासात घरपोच सामान मिळेल.", मी पाहतच राहिले. चांगल्या वस्तू, माफक किंमत मूळ म्हणजे घरपोच? तसा गोव्यात पहिलाच अनुभव मला असा. भानावर आल्यावर यादी दिली आणि झाली एका नवीन नात्याला सुरुवात.

दर महिन्याला एक तारखेला लिस्ट दिली की माल हजर. सगळेच सोपे झाले. अर्थात यादी देताना थोडे इतर बोलणे होई. ताई तशी माणूसप्रेमी. त्यामुळे मैत्रीची विण घट्ट व्हायला वेळ लागला नाही.

सहकारे ताई म्हणजे पद्मा सहकारे. मूळ फोंडा. आई शिक्षिका आणि वडील स्वातंत्र्य सैनिक. तसे सुधारक वातावरण. वडील जवळच्या भागातील शेतकऱ्यांकडून नारळ, सुपारी, वगैरे घेऊन मार्केटमध्ये विकत. शेतकऱ्यांना रोख रक्कम देत त्यामुळे शेतकरीही खूश. कमाईही चांगली. नंतर त्यांनी सहकारी पतपेढीही चालू केली. तर अश्या ह्या सुधारक घरातून आलेल्या ताई सहकारातून व्यवहार कसा करायचा हे नीट शिकून मगच सासरी आल्या. सासर मडगाव येथे. सहकारे परिवारही तसा सुधारक मिस्टर वकील, त्यामुळे घरात रमायला वेळ लागला नाही. तसे मडगाव येथे एका बाजूला घर त्यांचे. घराभोवती कुळागरे होती. साहजिकच घरात खूप कामकरी बायकांचा राबता असायचा. घरात मोकळ्या असणाऱ्या ताईंनी त्या सर्व बायकांना साक्षर करायचे ठरविले. अर्थात घरातल्यांच्या साथीने. मुळाक्षरे शिकव, शारीरिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता शिकव असे उपक्रम चालू केले. ताई आता जरा बिझी राहू लागल्या. पण व्हायचे काय की काही घरगुती वस्तू आणायच्या तरी मडगाव बाजारात जावे लागे. एक तर खर्चिक आणि वेळकाढू जास्त. आणि शिवाय रोजच्या उपक्रमातही खंड पडे. त्यात ताईंनी एक आजमावले की ह्या स्त्रियांना बारा महिने काम नसे. शिवाय घरात तशी परिस्थिती बेताचीच. त्यामुळे त्या बायका जरा शिकायला यायला प्रॉब्लेम करत. अर्थात पोट भरणे हा मुख्य हेतू मग पुढचे पुढे असा त्यांचा विचार.

ताईंनाही यावर तोडगा मिळत नव्हता. असेच एकदा काही पावणे आले होते मुंबईहून. त्यांच्यासमोर हे विषय आले गप्पा मारता मारता. ताईंचा उपक्रम पाहून पाहुणे खूश झाले. त्याचवेळी ताईंनी आपली अडचणही सांगितली त्यांना. बोलता बोलता एकाने सुचविले सहकारी तत्त्वावर धान्य विक्री. ताईंना प्रथम कळेना. मग त्याने विस्ताराने सांगितले. बघा ताई एक तर तुमच्या गावी बजारहाटाची अडचण, दुसरे तुम्हालाही तुमचा साक्षरतेचा उपक्रम पुढे न्यायचाय. बघा तुम्हीच चालु करा सहकारी तत्त्वावर किराणा सामान विकणे, अगदी घरपोच. लोकंही खूश आणि तुम्हालाही अर्थप्राप्ती. मग त्यातून द्या ठराविक वाटा त्या गरीब बायकांना. ह्यातून दोन फायदे होतील. लोकांच्या गरजाही भागतील घर बसल्या, आणि पैसा रोज मिळतो म्हटल्यावर त्या बायकाही सुरळीत येतील कामाला. मग तुमचा हेतूही साध्य होईल त्यांना शिकवायचा."; ताईंच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी घरच्यांशी बोलून त्या दृष्टीने प्रयत्न चालु केले. पुण्या मुंबईत असे प्रकार चांगलेच मूळ धरू लागले होते. तिथे जाऊन ताईंनी पाहणी केली आणि आल्या त्या काही मनाशी ठरवूनच. मडगावजवळ उद्योग वसाहतीमुळे खूप बाहेरील कुटुंबे मडगाव येथे स्थायिक झाली होती. तसेच मडगावजवळ ग्रामीण भागातही वस्ती वाढू लागली. ताईंनी अभ्यास केला आणि मनाशी खूणगाठ बांधली. सुरु केला नवीन सहकारी बिझनेस. तसे व्यवहारातून सहकार हे बाळकडू माहेरकडूनच घेऊन आलेल्या ताईंना हे काही विशेष नव्हतं.  घरातूनच सुरूवात झाली. बेळगावमधून व्यापारी शोधले माल पुरवायला. पॅकिंग करायला, इतर कामाला बायका होत्याच. आता प्रश्न होता ऑर्डर मिळण्याचा. त्यावेळी इंटरनेट नव्हता. मग काय पेपरमध्ये जाहिराती पाठव, नातेवाईकांच्या ओळखी, तसेच उद्योग वसाहतीत ओळखी वाढून हळूहळू सुरुवात झाली. अर्थात चांगला माल, रास्त दर, तसेच घरपोच सेवा यामुळे हळूहळू नाव वाढू लागले. आणि शेवटी बाकी कोणत्याही जाहिरातीपेक्षा मौखिक जाहिरात हिच मुख्य बघा. ताईंचा गोड स्वभाव, बोलणे, त्याच दिवशी माल घरपोच करणे, हळूहळू लोकांना आवडू लागले. शिवाय क्वालिटी चांगली. मग काय विश्वास बसला गिऱ्हाईक लोकांचा.

धंदा वाढू लागला, आवकही वाढू लागली. बायकांना वर्षभर काम मिळू लागले. अर्थात् त्याही बिनघोर झाल्या. ताईंनी फायदा उचलला. सर्व काम करणाऱ्यांना एक तास शिकवणी सक्तीची केली. अर्थात् त्या गरिबांच्या फायद्याचेच होते ते. ताईंनी सर्व कामगारांना बँकेत अकाउंट उघडून दिले. ताईंचा मनातील हेतूही सफल झाला.

आजही सहकारे ताईंचा हा उपक्रम जोरात चालु आहे. कोविड काळात लॉकडाऊनमध्ये तर खूप फायदा झाला अनेकांना. सहकारे ताईंनी आता गोव्यातील तीन शहरात व्यवसाय विस्तारला आहे. एक सुपर मार्केटही सुरु केले आहे. सहकारी तत्त्वावर व्यवसाय करणारी उद्योजिका म्हणून ताईंचा गौरव होतोय सगळीकडे. अनेक गरीब स्त्रियांच्या संसाराला हातभार लागलाय ताईंचा. अजून उपकार विसरत नाहित त्या ताईंचे. आज जवळजवळ हजार तरी सभासद आहेत जे दर महिन्याला सामान घेतात ताईंकडून. खरेच सहकारातून व्यवहार साधलाय ताईंनी.


  रेशम जयंत झारापकर 

मडगाव