नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक धोरणे अवलंबिली आहेत. दरम्यान याप्रकरणाच्या चौकशीचे काम केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवले आहे. मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली असून, आता अधिकृतपणे तपास सुरू करण्यात येणार आहे. हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये १४५० संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये २५० ओव्हर ग्राउंड वर्कर सामील आहेत. भारत-पाकिस्तान संबंधांतही या घटनेनंतर तणाव वाढला आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन व्हॅली येथे दुपारी २.४५ ते ३ दरम्यान हा हल्ला झाला होता. 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटनस्थळी सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवून २६ जणांचा बळी घेतला होता. या भीषण हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी गट 'द रेजिस्टन्स फ्रंट'ने घेतली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो पाकव्याप्त काश्मीरमधून कार्यरत आहे.