सिद्दिकी सुलेमान पलायन प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

मी पसार झालो नाही, तर पोलिसांनीच पळवून लावले : सिद्दिकी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 10:53 am
सिद्दिकी सुलेमान पलायन प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

पणजी : जमीन व्यवहार प्रकरणात अटक केलेला मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान गुन्हा शाखेच्या कोठडीतून पसार झाला होता. आपण पसार झाला नव्हता तर आपल्याला पोलिसांनी पळून लावले होते असा दावा करून प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करावी. अशी मागणी करून सिद्दिकी सुलेमान याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

जमीन व्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी खान चार वर्षांपासून फरार होता, गुन्हा शाखेच्या विशेषतपास पथकाने (एसआयटी) त्याला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हुबळीमधून अटक केली होती. सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. 

त्यासाठी त्याने तत्कालीन आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक याची मदत घेतली होती. गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम (केरळ) पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ रोजी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी सिद्दिकी याच्यासह बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक आणि हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास करून पोलिसांनी वरील प्रकरणात सिद्दिकीसह इतरांविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

दरम्यान फरार असताना सिद्दिकीने व्हिडिओ जारी करून 'पोलिसांनीच मला हुबळी येथे आणले आणि एनकाऊंटर करण्याची धमकी देऊन सोडून दिले. मला सोडण्यात दहा ते बारा पोलिसांचा सहभाग आहे. मी गोव्यात परत यायला तयार आहे; पण सीबीआयमार्फत प्रकरणाचा तपास झाला पाहिजे.' 

या व्हिडिओत त्याने पोलिसांसह एका आमदारावरही आरोप केले होते. दरम्यान सिद्दिकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पलायन प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा