मेरठ हत्याकांडाची घेतली होती धास्ती
संत कबीर नगर : प्रेमासाठी जीव देणारे आणि प्रसंगी जीव घेणाऱ्यांची या जगात काही कमी नाही. पण स्वतःच्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देणारे जरा विरळच. पण हा असा प्रकार घडलाय. उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर येथील एका पतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आणि क्षणात ही गोष्ट सगळीकडे व्हायरल झाली. पंच आणि गावकऱ्यांसमोर झालेला हा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, गुरुवारी, पतीने खुलासा केला की मेरठच्या सौरभ हत्याकांडामुळे तो खूप घाबरला होता.
सौरभप्रमाणे त्यानेही आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराला भेटण्यापासून अनेक वेळा मनाई केली होती. तरीही ती काही बधली नाही. त्याचीही गत सौरभ सारखीच होईल या विचाराने तो पुरताच गांगारला होता. लवकरच काही केले नाही तो देखील कुठल्याश्या ड्रममध्ये आढळून येईल या विचाराने आणि त्यांची झोपच उडाली.'धड सलामत तर सदरे पन्नास' म्हणत या पठ्ठ्याने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत करण्याचा निर्णय घेतला.
माहितीनुसार, संत कबीर नगरच्या धनघाटा पोलीस स्टेशन परिसरातील कटार मिश्रा गावातील रहिवासी बबलूचा विवाह २०१७ मध्ये गोरखपूर येथील राधिकाशी झाला होता. काही वर्षे सर्व काही व्यवस्थित चालले. दोघांनाही दोन मुले आहेत. दरम्यान, जेव्हा बबलू कामासाठी शहराबाहेर गेला तेव्हा राधिका तिच्या गावातील विशालच्या प्रेमात पडली. गेल्या दीड वर्षात दोघांमधील जवळीक इतकी वाढली की लोकांनी विशालला राधिकासोबत अनेक वेळा ये-जा करताना पाहिले. जेव्हा बबलूला हे कळले तेव्हा त्याने राधिकाला विशालसोबतचे नाते तोडण्यास सांगितले. आपल्या दोन्ही मुलांचीही काळजी न करता, राधिकाने तिच्या पतीचे ऐकले नाही. ती तिच्या प्रियकराला भेटत राहिली.
दरम्यान, मेरठ आणि औरैयामध्ये दोन भयानक घटना उघडकीस आल्या. मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिच्या प्रियकरासह पती सौरभची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले. यानंतर, शरीर एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंटचे द्रावण देखील ओतण्यात आले. त्याचप्रमाणे, औरैयामध्ये, लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांनी, प्रगती यादवने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एका मारेकऱ्याला कंत्राट देऊन तिच्या पतीची हत्या केली.
या दोन्ही घटनांमुळे बबलू खूप धास्तावला. त्याने आपल्या पत्नीला सोडून सर्वांसमोर तिचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याचा निर्णय घेतला. बबलू राधिका आणि तिचा प्रियकर विशालसोबत घनघाटा तहसीलमध्ये पोहोचला. येथे एक करार पत्र तयार करण्यात आले. यानंतर, गावकऱ्यांच्या उपस्थितीत शिव मंदिरात दोघांचेही लग्न झाले . मुलांना स्वतःकडे ठेवण्याची आणि त्यांना वाढवण्याची जबाबदारीही त्याने घेतली. हे सगळे काही पार पडले आणि बबलूने सुटकेचा निश्वास टाकला. गमतीचा भाग सोडला तर, व्याभिचार आणि विवाहबाह्य संबंधांमुळे अजून एका सुखी संसाराचा मुडदा निर्लज्जपणाच्या ड्रममध्ये आढळून आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.