मिर्झापूर : उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमध्ये भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. प्रयागराज-वाराणसी महामार्गावर कच्छवाजवळ रात्री एक वाजता घडलेल्या अपघातात ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. वेगवान ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली अलेले काहीजण हवेत फेकले गेले व रस्त्याबाजूलाच असलेल्या नाल्यात जाऊन पडले. या धडकेत १० जणांचा मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात मृत पावलेले लोक भदोही येथून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून वाराणसीला जात होते.
समोर आलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसलेले सर्व मजूर भदोहीच्या तिउरी गावात छताचे मोल्डिंगचे काम करून वाराणसीला त्यांच्या घरी जात होते. लेबर कॉन्ट्रॅक्टर देखील दुचाकीवरून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागे जात असताना औरई बाजूने एक अनियंत्रित ट्रक आला. ट्रॅक्टर चालकाला काही समजण्यापूर्वीच अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, रस्त्याने जाणाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले. क्रेन मागवून ट्रक आणि ट्रॅक्टर वेगळे करण्यात आले.
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी रास्ता रोको केला. गदारोळ सुरू केला. याची माहिती मिळताच एसपी अभिनंदन आणि सीओ सदर पोहोचले. त्यांनी कसेबसे लोकांना समजवून वाहतूक कोंडी मिटवली.
भानू प्रताप (२५), विकास (२०, रा. रामसिंगपूर मिर्झामुदार) आणि अनिल (३५), सूरज कुमार (२२), सनोहर (२५), राकेश कुमार (२५), प्रेम कुमार (४०) अशी मृतांची नावे आहेत. राहुल कुमार, रा. बिरबलपूर (२६), नितीन कुमार (२२), रोशन कुमार. जखमींमध्ये आकाश (१८), जमुनी (२६), अजय सरोज (५०, रा. बिरबलपूर) यांचा समावेश आहे.