विश्वचषक २०२३ मधून भारताने केली अब्जावधींची कमाई

आयसीसीकडून आकडेवारी जाहीर : कमावले तब्बल ११ हजार कोटी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
11th September, 10:47 pm
विश्वचषक २०२३ मधून भारताने केली अब्जावधींची कमाई

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेआर्थिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये २०२३ एकदिवसीय विश्वचषक कमाईच्या बाबतीत इतिहासातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असल्याचे सिद्ध झाले आहे. याच अहवालात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे की, विश्वचषक स्पर्धेने भारतीय अर्थव्यवस्थेत १.३९ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ११,६३७ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
हा कार्यक्रम २०२३ मध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसह एकूण १० शहरांना विश्वचषक सामन्यांचे यजमान हक्क देण्यात आले होते. आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्ड कपमध्ये थेट गुंतवणूक केली होती. त्यांच्या व्यतिरिक्त, राज्यांच्या क्रिकेट संघटनांनीही विविध क्षेत्रात भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. मात्र, ही रक्कम विश्वचषकातील संपूर्ण कमाई आहे का, हे आयसीसीने स्पष्ट केलेले नाही.
पर्यटनातून भरघोस नफा
ज्या शहरांमध्ये विश्वचषक सामने खेळले गेले त्या शहरांमध्ये पर्यटन उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली गेली. विश्वचषकादरम्यान निवास, खाद्यपदार्थ, प्रवास आणि वाहतूक यासह पर्यटनाने सुमारे ७,२३१ कोटी रुपये कमावले. यावेळी एकूण १२ लाख ५० हजार लोक विश्वचषक थेट पाहण्यासाठी आले होते, हाही एक विक्रम आहे.
परदेशी प्रवाशांमुळे फायदा
परदेशी प्रवाशांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही फायदा झाला आहे. परदेशी प्रवाशांची निवास व्यवस्था, विविध शहरांचा प्रवास आणि इतर गोष्टींद्वारे २,३६० कोटी रुपये कमावले आहेत. ६८ टक्के परदेशी प्रवाशांनी असेही सांगितले की ते त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना भारतात भेट देण्यास नक्कीच सांगतील. बहुतेक परदेशी प्रवाशांनी भारतात ५ रात्री घालवल्या, तर भारतीय देखील एका शहरात सरासरी २ रात्री राहिले. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून सहाव्यांदा एकदिवसीय विश्वविजेतेपद पटकावले होते.