आयसीसी टी-२० रँकिंग : सलग ९ व्या महिन्यात अभिषेक शर्मा अव्वल

दुबई : भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, कोणताही सामना न खेळता बुमराहने हे स्थान गाठले आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या बुमराहचे सध्या ७०२ रेटिंग गुण आहेत.
विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यांमुळे क्रमवारीत बदल झाले. दक्षिण आफ्रिकेच्या कोर्बिन बॉशला या सामन्यांत संधी न मिळाल्याने त्याचे रेटिंग गुण कमी झाले आणि तो सहाव्या क्रमांकावर घसरला. याचा थेट फायदा बुमराहला झाला आणि तो पाचव्या स्थानावर पोहोचला.
फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा (८७५ रेटिंग गुण) याचे वर्चस्व कायम आहे. जुलै २०२५ मध्ये जगातील नंबर १ फलंदाज बनलेला अभिषेक सलग ९ व्या महिन्यात आपल्या पहिल्या स्थानावर टिकून आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडच्या डेव्हन कॉनवेने चार स्थानांची सुधारणा करत ७० वे स्थान गाठले आहे.
मिचेल सँटनरने (न्यूझीलंड) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ३ बळी आणि ३५ धावा केल्यामुळे गोलंदाजांच्या क्रमवारीत ११ स्थानांची झेप घेत १३ वे स्थान गाठले आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यामुळे पाकिस्तानच्या सलमान अली आगाने ९ स्थानांची प्रगती करत ९ वे स्थान मिळवले आहे. त्याचे रेटिंग गुण आता के.एल. राहुल (६६४) इतकेच आहेत.
एकदिवसीय क्रमवारीत बांगलादेशचा दबदबा
पाकिस्तानविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. मेहदी हसन मिराज गोलंदाजी क्रमवारीत ९ स्थानांच्या प्रगतीसह तो ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. तस्किन अहमद १२ स्थानांच्या फायद्यासह २८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुस्तफिजुर रहमान १३ स्थानांच्या झेपसह ४७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जसप्रीत बुमराहला मिळणार २ कोटींची 'भरपाई'
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंच्या केंद्रीय कराराची नवीन यादी जाहीर करून साधारण दीड महिना उलटला आहे. मात्र, आता बोर्डाला खेळाडूंच्या श्रेणी आणि त्यांच्या मानधनाच्या मुल्यांकनात बदल करणे भाग पडले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मानधनाबाबत बोर्डाला चिंता सतावत आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना योग्य मोबदला देण्यासाठी बीसीसीआय नवीन श्रेणी पद्धतीचा फेरविचार करत आहे. यापूर्वी, पुरेशा प्रमाणात खेळाडू पात्र ठरत नसल्याचे कारण देत बोर्डाने 'अ+' ही सर्वोच्च श्रेणी रद्द केली होती.
टी-२० विश्वचषक २०२६ मधील बुमराहची कामगिरी पाहता, त्याचे मानधन ७ कोटींवरून ५ कोटी रुपये करणे अन्यायकारक ठरेल, असे बोर्डाचे मत आहे. त्यामुळे त्याला २ कोटींची विशेष भरपाई किंवा पुन्हा 'अ+' श्रेणीत समाविष्ट करून ७ कोटी देण्यावर विचार सुरू आहे.
केवळ बुमराहच नाही, तर अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंनाही त्यांच्या कामगिरीच्या तुलनेत खालच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. अक्षर पटेल टी-२० अष्टपैलू क्रमवारीत ११ व्या स्थानावर असूनही त्याला 'क'श्रेणीत ठेवण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. अहवालानुसार, बोर्डाने अद्याप खेळाडूंना त्यांच्या कराराचे अधिकृत मूल्य कळवलेले नाही. त्यामुळे कोणत्या श्रेणीसाठी किती रक्कम मिळणार, याबाबत खेळाडूंमध्येही स्पष्टता नाही.
श्रेणी पद्धतीतील पेच
पूर्वी 'अ+' श्रेणी अशा खेळाडूंसाठी राखीव होती जे तिन्ही फॉरमॅट खेळतात आणि कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल १० खेळाडूंमध्ये येतात. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने केवळ बुमराहच या निकषात उरला होता. सध्या 'अ' श्रेणीत फक्त शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
बदलाची शक्यता
भारताने २०२५-२६ च्या हंगामात पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये (एक दिवसीय आणि टी२०) प्रचंड यश मिळवले आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या, सिराज आणि पंत यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना 'अ' वरून 'ब' श्रेणीत ढकलणे चुकीचे ठरेल, असा सूर बीसीसीआयमध्ये उमटत आहे. त्यामुळे लवकरच या करारांच्या मूल्यांकनात सुधारणा झालेली पाहायला मिळू शकते.