पालिका मंडळाला अधिकार्यांची ग्वाही
फोटो ः म्हापसा शहारत अशा प्रकारे सर्वत्र पडलेले कचर्याचे ढीगारे. (उमेश झर्मेकर).
म्हापसा ः येथील नगरपालिकेच्या गैरव्यवस्थापनामुळे म्हापसा शहरात स्वच्छतेची गंभीर समस्या बनली आहे. घरोघरी आणि ब्लॅक स्पॉट्सवरील कचरा संकलन होत नाही. जागोजागी कचर्याचे ढीग साचले शहरात दुर्गंधी पसरल्याचा दावा करीत नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांसह पालिका अभियंते व पर्यवेक्षकांना धारेवर धरले. येत्या तीन दिवसांत कचर्याचे ढीगमुक्त शहर करण्याचे आश्वासन पालिका अभियंता विभागाने पालिका मंडळाला दिले.
बुधवारी 31 जुलै रोजी नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकरांच्या अध्यक्षतेखाली शहरातील संकलन व्यवस्थापनाविषयी बैठक नगरसेवक व अधिकार्यांसवमेत झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, पालिका अभियंता आगुस्तीन मिस्किता, प्रशांत नार्वेकर, कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक आणि नगरसेवक उपस्थित होते. चार नगरसेवक यावेळी गैरहजर राहिले.
बैठकीत नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांतील कचरा संकलनाचे व्यवस्थापन कोलमडल्याचे सांगून कचर्याचे ढिगारे साचल्याने संबंधितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक व अधिकार्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप व शाब्दिक चकमक झाली.
पालिका अधिकारी आणि कर्मचार्याच्या समन्वयाच्या अभावामुळेच शहराला हे गलिच्छ स्वरुप प्राप्त झाले आहे. पालिकेकडे रोजंदारीसह 312 कामगार आणि आवश्यक कचरावाहू वाहने आहेत. तरी देखील योग्य कचर्यांयची उकल का होत नाही. या कामगारांची हजेरीपट्टी बैठकी समोर सादर करण्यात यावी, अशी सूचना नगरसेवकांनी नगराध्यक्षांना केली. पण पर्यवेक्षकांनी ही पजेरीपट्टी शेवट पर्यंत सादर केली नाही.
बैठकीत पालिका अभियंत्यांनी तांत्रिक अचडणींसह इतर कारणांचा पाढा मांडला. पण ही कारणे नगरसेवकांना मान्य झाली नाहीत. नगरसेवकांचा वाढता रोष पाहून शेवटी येत्या तीन दिवसांत सर्व कचर्याचे ढीगारे हटवू तसेच घरोघरी कचरा संकलनात सुधारणा आणण्यासह ही समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन पालिका अधिकार्यांकडून नगरसेवकांना देण्यात आले.
पालिकेकडे एकूण 13 कचरावाहू वाहने आहेत. त्यातील दोन कॉम्पॅक्टर नादुरुस्त आहेत. तर एक ट्रक दुरुस्तीनंतरही गॅरेजमध्ये पडून आहे. संबंधित गॅरेजवाल्याचे कामाचे बिल दिले जात नसल्याने गाडी गॅरेजमधून बाहेर काढता येत नाही. शिवाय नगरपालिकेची बिले वेळेत मंजूर होत नसल्याने गॅरेजवाले असो किंवा इतरांनी म्हापसा पालिकेसोबतचा उधारी कारभार बंद केला आहे, असे या बैठकीतील चर्चेतून उघड झाले आहे.
- पालिकेजवळ एकूण 312 सफाई कामगार आहेत, मात्र या कामगारांच्या हजेरीपटावर वाणवा.
- पालिकेची कचरावाहू वाहने प्रत्येकवेळी नादुरुस्त होतात. दुरूस्तीची बिले मंजूर होत नसल्याने गॅरेजवाले कामे घेत नाहीत. पालिकेजवळ कचराकुंड्यांची कमतरता.
- मार्केट मधील सोपो व पे-पार्किंग शुल्क पालिका स्वतःच्या कामगारांमार्फत वसूल करते. यासाठी 30-35 कर्मचारी जुंपले गेले आहेत. त्यामुळे कचरा संकलनाच्या कामाकडे दुर्लक्ष.
- पालिका रोजंदारी कामगारांना दिवसाला 500 रुपये देते, पण हे पैसे कमी असल्याने रोजंदारी कामगार पालिकेची कामे करण्यास स्वारस्य दाखवत नाहीत.
पालिकेच्या कचरा गैरव्यवस्थापनामुळे म्हापसला शहरात कचर्याची समस्या जटील बनली आहे. 312 कामगार असताना कचरा उकल का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे. पालिका मंडळाला अंधारात ठेऊन कारभार सुरू आहे. येत्या तीन दिवसांत शहरातील कचरा हटविण्याची हमी बैठकीत दिली आहे.
- सुधीर कांदोळकर, नगरसेवक.
कुचेली प्रकल्पावर मिश्रीत कचरा घेतला जात नाही. यामुळे शहरात ब्लॅक स्पॉटवर कचरा साचून आहे. पावसाळा असल्याने कचर्याचे वर्गीकरण करता येत नाही. सद्यस्थितीत आउटसोर्सवर तीन वाहने घेऊन कचरा उचलला जाईल. कचरा वर्गीकरण आणि उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कठोरपणे निर्णय घेऊ. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी या सर्व गोष्टी जाग्यावर पडतील.
- डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्षा