पाऊस परतीचा आणि प्रितीचाही ..

Story: ऋषभ | वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th June, 05:01 pm
पाऊस परतीचा आणि प्रितीचाही ..

परतीचा पाऊस अन् त्याने आंदण म्हणून दिलेल्या आठवणी ह्या बद्दल काय लिहावे ह्या विवंचनेत गुरफटून गेलो असतांनाच , आपसूक मनातल्या एका सुप्त कोपऱ्यात असलेल्या एका काळोख्या अंधाऱ्या खोलीचे कुलूप अलगदसे उगडले जाते. त्या खोलीतल्या जमिनीवर विखुरलेल्या त्या आठवणींच्या  बखरी, भिंतीवरच्या आरशावर  साचलेली धूळ अन्  त्या तिथल्या धुमिळ आरशासमोर मठ्ठ पणे उभा असलेला मी! मनाच्या अशाच कुठल्याशा कोपऱ्यातून एका आर्त  स्वरात एक मंद गजल एकु येते 

“होशवालों को खबर क्या,बेखुदी क्या चीज है…(x२)

इश्क किजे फिर समझिये( x२)

 जिंदगी क्या चीज है......”

मग मी त्या आरशाचा  नाद सोडून  त्याच जुन्या ८x१० च्या जुन्या तसबिरी, ज्या त्या भिंतींवर टांगल्या गेल्या, तिच्या हस्ते कायमच्याच त्या बघत राहतो....

“ उनसे नजरे क्या मिली रोशन फिजाये हो गयी,

ऑर वो समझे नाही ये,

खामोशी क्या चीज है......(x२)”

समोर एक भले मोठे गाठोडे दिसते...मग एक एक गाठ जी नियतीने साळसूदपणे बांधली ती मी उगाच उलगडण्याचा प्रयत्न करतो. का? विनाकारण ठरवून मृगजळ शोधून त्याच्या चकव्यात परत परत फिरत राहणे ही सवयच आहे मला! पुरातत्व विभागाच्या एका खंद्या शास्त्रज्ञाचा  आव आणून त्याच आठवणींवर हलकेच ब्रश फिरवतो. ब्रश जेवढे खोलात साफ करीत जातो तेवढ्या ठळकपणे तिची आकृती सामोरे येत जाते. 

“ ये बता दे मुझे जिंदगी(x२)

प्यार के राह के हमसफर,

 किस तरह बन गये अजनबी....!

 ये बता दे मुझे जिंदगी....(२x)

फुल सारे क्यूँ मुरझा गये.....!

…जगजीत जी आणि चित्रा जी अजूनही त्या खोलीतून महफिल  सजवतायत....

आठवण अन् एकटेपण यांचे काय नाते आहे हे आजतागायत नाही हो पूर्णपणे समजू  शकलो! ती तेव्हाच येते जेव्हा “तीच” नसते, काय म्हणावे तिला  समजत नाही....सावली? म्हणले तर सावलीच ती, पण तिच्या सारखा अंधार सावलीचा नसतोच मुळी! तिची आठवण म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला दिलेले आव्हान आहे हे मात्र नक्की....!

 मी स्वतःशीच म्हणतो की चला आज सुट्टी आहे जरा साफ सफाई करून घेऊयात …! 

“म्हणजे कितीदा नवे मार्ग शोधावे माणसाने स्वतःला उध्वस्त करण्याचे ? 

अवघड आहे बुवा !”....नुकतेच धुतलेले कपडे वॉशिंग मशीन मधून काढता काढता म्हणतो मी स्वतः लाच ....

तोच संदीप खरे अन् सलील कुलकर्णी ही द्वयी एव्हाना खोलीतून आपली गजल एकवू लागली. 

“ नसतेस घरी तू जेव्हा....

जीव तुटका तुटका होतो.....

जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो....

नभ फाटून वीज पडावी…

कल्लोळ तसा ओढवतो.....

ही धरा दिशाहीन होते…

अन् चंद्रकोर काहूरते.....”  

....

मी परत आपला बादली घेवून कपडे घेऊन गच्ची वर वाळत  घालून येतो.....

आता जरा लिंबू सरबत पिऊ म्हणतोय...ही गरमी काही सोसवेना बुवा....

“रींगग्गग्गग्गग्गग्गग्गग्गगग्ग.......”

 रींगग्गग्गग्गग....

....

रींगग्गग्गग्गग्गग्गग्गग्ग.....

रींगग्गग्गग......”

कोण असेल ह्या वेळी आता....

मी कटकट करीत दार उघडले.....

“किती वेळ अरे दार उघडायला....?

काय मॅड दिवस होता रे आजचा.... सकाळी बस उशिरा आली...कामावर लेट पोहोचली...त्यात क्लाएंट ने मीटिंग कॅन्सल केली....काल रात भर जागून किती तयारी केलेली प्रेझेंटेशनची.... कोणाला काही कीमतच नाही...येताना बाजारातून आवळे आणि कलिंगड घेतलेत अन् हो, लिंबू खूप महागलेत म्हणून जरा कमीच घेऊन आले.....किती गर्दी होती रे बाजारात...गर्मी सुद्धा.....वाफा निघत होत्या डोक्यातून.....!

पाऊस पण पडतोय बाहेर … चिंब भिजले ना मी.....हे घे ठेव समान.....आजकाल कधीपण पाऊस पडतो रे...ऑक्टोबर- नोव्हेंबर काय पाऊस पडण्याची वेळ?.....पाऊस पण ना तुझ्या सारखा अनप्रेडिक्टेबल आहे…

अरे..असा का तोंड आ वासून उभा आहेस देव ?.....अरे टॉवेल आणून दे लवकर....ते लिंबू सरबत आहे का हातात तुझ्या? दे ते इकडे...टॉवेल आण  जा…!.......”

मी तरीही तेथेच उभा

“.....ए आरे देव....टॉवेल दे रे सायबा....! आणि  एसी  लाव ....” लिंबू सरबतचा ग्लास पूर्ण रिचवत माया बोलली.....!

मी स्वतः शीच हसत हसत  आत जाऊन एक स्वच्छ टॉवेल घेवून आलो…

“काय बघतोय असा...अन् आज घर साफ वगेरे केलेस? काय प्लॅन आहे....?

मागून जगजीत जी आणि चित्रा जी सुर घेतायत..

“तुमको देखा तो यह खायाल आया.....

जिंदगी धूप...तुम घना साया......!”

......तर गजल एकत  होतास....? 

“ हो....खूप आठवण आली तुझी…”

“.....का रे…?

“सकाळी उठलो तर बेडची दुसरी बाजू खाली होती....”

“अरे अरे अरे..... काय करू मी तुझं....” ती माझेच केस विस्कटून म्हणाली…”

अन् मी तिचे केस टॉवेलने अन् ब्लोअर ने वाळवण्यात व्यस्त झालो......!

“देव....ती बादली हॉल मध्ये काय करतेय ?” तीने केसांना टॉवेल गुंडाळत विचारले.

मी तिकडेच घुम्या सारखा उभा राहिलो....

काय सांगणार गच्चीवर कपडे घातलेले ते विसरलो महणून…?

“.....अरे यार............”

तिने हातास धरून मला वर गच्चीवर नेले…

“कसा विसरलास रे?…”

“कामात बिझी होतो ना मी, विसरलो असेन.....”

“हे बरे आहे आपले ....” 

पाऊस कोसळत होता...आसमंत भारून आला होता…

“आजपर्यंत खूप पावसाळे सोबत पाहिले ना आम्ही....?

पण असा परतीचा पाऊस नाही ना रे पहिला.....”

“नाही......!” तीला भर पावसात मिठीत घेत मी म्हणले...

“भलताच रोमेंटिक झालायस आज....!” ती माझे केस विस्कटत म्हणाली. 

“परतीच्या पावसाची जादू असेल बहुतेक......” 

“ अह.. !ही कमाल  प्रितीच्या पावसाची आहे.."  मी तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हटले....


-ऋषभ