अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि क्विक रिस्पॉन्स टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये आज, २९ मार्च रोजी एक भीषण रस्ता अपघात घडला. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ एक कॅब दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सदर कॅब जम्मूहून श्रीनगरला प्रवाशांसह जात असताना अपघात झाला.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन भागातील बॅटरी चष्माजवळ हा अपघात झाला. स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच, पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि रामबन येथील नागरी जलद प्रतिसाद दल (क्यूआरटी) तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पथकाने तात्काळ दरीत उतरून बचावकार्य सुरू केले आणि लोकांचे मृतदेह बाहेर काढले.
बचावकार्य पहाटेपासून सुरू झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दरीतून आतापर्यंत १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, या भागात खोल खंदक, अंधार आणि सततचा पाऊस यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, मदतकार्य काही काळ थांबवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.बचाव मोहिमेतील सर्वात मोठी अडचण पावसाची आहे, त्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना खूप त्रास होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उत्तररात्री १.१५ च्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी सांगितले की, तवेरा कार प्रवाशांसह काश्मीरला जात होती. मात्र जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गानजीक ही कॅब ३०० मीटर खोल दरीत कोसळली. आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले असून कुटुंबीयांना माहिती देण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रामबन येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.