पावसाने खेळ बिघडवला; किताबी लढत आज
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
अहमदाबाद : आयपीएल ची अंतिम रात्र जबरदस्त अॅक्शन, थरारक स्पर्धा आणि सुंदर विजेतेपदाच्या सेलिब्रेशनची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांसाठी ‘अँटी-क्लायमॅक्स’मध्ये बदलली. जो धोका हलकेपणाने व्यक्त केला जात होता, तो खरा तर ठरलाच. अहमदाबादमध्ये अवकाळी पावसामुळे, रविवार, २८ मे रोजी चेन्नई सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२३ चा अंतिम सामना खेळला जाऊ शकला नाही. आता हा सामना सोमवार २९ मे रोजी राखीव दिवशी होणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई आणि गुजरात यांच्यातील ही फायनल पाहण्यासाठी सायंकाळपासूनच गर्दी झाली होती. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साह होता. विशेषत: एमएस धोनी सहाव्यांदा विजेतेपद पटकावताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण गुजरातच्या हवामानाने दगा दिला आणि या फायनलची प्रतीक्षा सतत वाढवली.
सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार होता, मात्र तासभर आधी पाऊस सुरू झाला. गुजरात आणि मुंबई यांच्यात दोन दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायरप्रमाणेच सायंकाळी ६ वाजल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला. त्या दिवशी काही वेळाने पाऊस थांबला होता आणि मग सामनाही सुरू झाला होता. अंतिम फेरीच्या दिवशी हे होऊ शकले नाही. एकदा पाऊस सुरू झाला की तो होतच राहिला.
९ वाजण्याच्या सुमारास मध्यंतरी एकदा पाऊस थांबल्याने आशा निर्माण झाली होती, मात्र १५ मिनिटांनी पुन्हा पाऊस सुरू झाला. यावरून हा सामना आज होणार नसल्याचे स्पष्ट झाले. रात्री ११ वाजता पंचांनी निर्णय घेतला की सामना आता राखीव दिवशी खेळवला जाईल.
राखीव दिवशी काय होईल?
आता प्रश्न असा पडतो की राखीव दिवशीही पाऊस पडला तर? नियमांनुसार, राखीव दिवशीही ३ तास २० मिनिटांच्या निश्चित वेळेव्यतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ असेल. म्हणजेच राखीव दिवशीही रात्री १२.०६ पर्यंत प्रतीक्षा केली जाईल, जेणेकरून ५-५ षटके खेळता येतील. ते शक्य नसेल तर सुपर ओव्हरमधून निर्णय घेतला जाईल. तेही होऊ शकले नाही, तर गुणतालिकेत पहिले स्थान मिळवणाऱ्या गुजरातला विजेता घोषित केले जाईल.