बालगुन्हेगारी राेखण्यासाठी मूल्यशिक्षणाची गरज

देशात गेल्या काही वर्षात बाल गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडल्याच्या बातम्या सातत्याने वाचायला व पाहायला मिळतात. बाल गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राईम इन इंडिया’चा अहवाल मागील वर्षी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार देशात अल्पवयीन मुलांवर दरवर्षी सरासरी ३५ हजार गुन्हे नोंदवले जातात. अर्थात ही आकडेवारी नोंदवलेल्या गुन्ह्यांचीच आहे. पोलीस दप्तरी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी काही गुन्हे खून, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासारखे गंभीर स्वरूपाचे आहेत.

Story: प्रासंगिक । श्याम ठाणेदार |
30th November 2022, 11:31 pm

आजकालची मुले गुन्हेगार बनत  आहेत ही अत्यंत दुःखाची,  धक्कादायक बाब आहे. झोपडपट्टीत राहणारे अल्प उत्पन्न गटातील मुले गुन्हेगारीकडे लवकर ओढली जातात असे म्हटले जाते. त्यांचे आई वडील मोलमजुरीसाठी घराबाहेर राहतात त्यामुळे मुलांना योग्य संस्कार देऊ शकत नाहीत. परिणामी ही मुले गुन्हेगारीकडे वळतात असा तर्क काढला जातो, पण महाराष्ट्रातील 

जालना येथील घटनेने हा तर्क चुकीचा ठरवला आहे. या घटनेतील ज्या मुलीने आपल्या लहान बहिणीची हत्या केली आहे तिचे आई वडील सुशिक्षित आहे. ती मुलगी एका प्रतिष्ठित शाळेची विद्यार्थिनी आहे. या आधी पुण्यात ज्या अल्पवयीन मुलाने आपल्या आजीची हत्या केली त्या मुलाचे पालकही उच्चशिक्षित होते. म्हणजेच सुशिक्षित कुटुंबातील मुलेही आता गुन्हेगारीकडे वळत आहेत.

 भारतासारख्या देशात बाल गुन्हेगारी वाढणे ही मोठी समस्या बनली आहे. आजकालच्या मुलांमध्ये भाई, डॉन, दादा बनण्याची मोठी क्रेझ आहे त्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळत आहेत. अल्पवयीन मुलांच्या टोळ्या, ग्रुप वाढत आहेत. पालकांचे लक्ष नसल्याने मुले चोऱ्या, मारामारी, खून यासारख्या गुन्ह्यांत अडकत आहेत. या मुलांना वेळीच सल्ला,  मार्गदर्शन मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील बाल गुन्हेगारी वाढत आहे ही धोक्याची घंटा आहे. ती कमी करण्यासाठी मुलांना संस्कारक्षम वयात पालक, शिक्षक यांच्याकडून योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.      

लहान वयात मुले काय करतात, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, याचाही विचार आई वडिलांनी करायला हवा. अभ्यासाकडे मुले का दुर्लक्ष करतात, याचाही विचार पालक आणि शिक्षकांनी करायला हवा. शिक्षणाऐवजी मुले गुन्हेगारीकडे  वळत आहेत, ही चिंतनीय बाब आहे. याला जितकी सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे तितकीच कौटुंबिक परिस्थितीही जबाबदार आहे. आपल्या देशात जोवर एकत्र कुटुंब पद्धती होती तोवर बाल गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य होते, पण एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आणि बाल गुन्हेगारी फोफावत गेली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुलांना चांगले      

शिक्षण देण्यासाठी पालक वाटेल ते करतात. त्यांना मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये लाखो रुपये डोनेशन देऊन दाखल करतात. त्यांना ज्या हव्या त्या सर्व वस्तू पुरवतात, पण मुलांसोबत वेळ घालवण्यास पालकांना फुरसत नसते. त्रिकोणी, चौकोनी कुटूंब पद्धतीत आजी आजोबा ही संकल्पना केव्हाच मागे पडली आहे. आई वडील दोघेही नोकरीस असतील तर मुले दिवसभर घरी एकटीच असतात अशावेळी टीव्ही आणि मोबाईल हेच त्यांचे साथीदार असतात, मग दिवसभर टीव्हीवरील क्राईम मालिका पाहणे आणि मोबाईलवर हिंसक गेम खेळणे हाच त्यांचा  उद्योग. दिवसभर क्राईम मालिका आणि हिंसक मोबाईल गेम खेळून मुलांच्या मनातही हिंसक विचार येतात त्यातूनच मग अशा घटना घडतात. त्यामुळेच आज मूल्यशिक्षणाची मोठी गरज निर्माण झाली आहे. आज मुलांना जितकी शिक्षणाची गरज आहे तितकीच तितकीच मूल्यशिक्षणाचीही आहे.      

परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आकडेवारीत मूल्यशिक्षण हरवत चालले आहे. मुलांवर संस्कार करण्यात पालक, शिक्षक आणि समाज कमी पडत आहे. मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी मूल्यशिक्षणाला पर्याय नाही. मूल्यशिक्षण ही काळाची गरज बनली आहे.