सिद्धार्थ देवधेकर : कोकणचा समर्थ कथाकार

सिद्धार्थ देवधेकर हे समकालीन पिढीतील कोकणचे समर्थ कथाकार. स्वागतशील असणारा हा लेखक प्रत्यक्ष राजकारणात असणे ही अनुभवाची मोठी सिद्धता आहे असे मानतो. त्यांच्या लेखन वाटचालीचा हा आढावा!

Story: वर्तमान | |
24th April, 01:15 am
सिद्धार्थ देवधेकर : कोकणचा समर्थ कथाकार

आज कोकणात राहून साहित्यलेखन करणाऱ्या साहित्यिकांमध्ये विपुल प्रमाणात कविता लिहिली जाते आहे. पण कथा, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेखनाचा अपवाद वगळता वणवाच आहे! पण या अपवादामध्ये कथेत अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते, ते म्हणजे कोकणचा समर्थ कथाकार म्हणून ज्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि ज्यांच्या कथेची पुढे दीर्घकाळ दखल घ्यावी लागेल असे सिद्धार्थ देवधेकर होत. शोषित घटकांचे दुःख सांगणे आणि ते वाटून घेणे हा विचार देवधेकर यांच्या कथा लेखनामागे आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेने म्हणजे कायद्याने जात संपवली; पण आज ती अधिक तीव्रतेने जाणवते आहे. ज्या स्त्रियांचे शोषण होत आहे, त्याही आपल चारित्र्य जपत आहेत. दुःख झेलून स्वाभिमानाने जगणारी माणसे आणि त्यांचा संघर्ष असे सगळे देवधेकर यांच्या कथेत दिसत. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पिढीतला महत्त्वाचा कथाकार हा जयंत पवार आहे! जयंत पवार यांच्या काही कथा या जागतिक पातळीवरच्या लेखनाशी तुलना कराव्यात अशा आहेत. तर प्रवीण बांदेकर यांनी महत्वाचे लेखन केले आहे. हे आपल्याला मान्यच करावे लागत. अशी समज असणारे आणि कुणाच्या गटातटाच्या विचाराखाली न येणारे देवधेकर हे या घडीला तरी कोकणातील एकमेव आजचे महत्वाचे कथाकार आहेत. म्हणूनच त्यांच्या लेखनाचे वेगळे अस्तित्व आहे, हे आपल्याला मान्य करावे लागते.

देवधेकर सुमारे चाळीस वर्षे कसदार कथालेखन करत आहेत. त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तिसरा प्रसिद्धीच्या मार्गावर आहे; पण त्यांच्या कथालेखनाची हवी तशी दखल घेतली गेली नाही. याची खंतही त्यांच्या मनात आहे. आपल्या लेखननिर्मितीविषयी बोलताना देवधेरकर म्हणतात, मनात घर करणारा, लेखकाला लिहायला भाग पाडणारा विषय असेल तर लेखक लिहितो. माझी कथा अशाच प्रकारे जन्माला येते. एखाद्या माणसाबद्दल कुतूहल का वाटते? तर त्याचे जगणे विलक्षण असते. आपल्याला असे जगता येत नाही. असं जगता आले असते तर, किती आनंद झाला असता. या आनंदाचे आकर्षण जसे आपल्याला वाटते तसे दु;खाबाबत असे जगणे आपल्या वाट्याला आले नाही हे मोठे निसर्गाचे उपकार आहेत, असे माणसाला वाटू लागणे याचा अर्थ त्या दुःखाची तीव्रता आपल्याला भयभीत करते. माझ्या कथेत दुःखी माणसे आहेत. काही अगतिक झालेली वाटतील; पण काही दुःख झेलून स्वाभिमानाने उभी असलेली दिसतील. माझ्या कथेतल्या स्त्रिया गरीब असल्यातरी चारित्र्याला जपणाऱ्या आहेत. त्यांच्यावर बुद्धाच्या तत्वांचा प्रभाव दिसतो. आपल्या देशातली जातीयता कधीही संपणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याने जातीयता संपवली असली तरी ती सर्वत्र जाणवते. तिची भीषणता कधी कधी कुठेतरी उघड होत असते. त्या समूहात लेखकाचा जन्म झालेला असेल तर तो त्यावरची आपली भावना कधी तीव्र, कधी सौम्य शब्दात व्यक्त करील. तशी माझ्या कथातून ती व्यक्त झाली आहे.

देवधेकर हे एक लेखक, एक माणूस म्हणून अतिशय स्वागतशील आहेत. याचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यात कायम येत असतो. ते म्हणतात, लेखक माझ्या ओळखीचा आहे. माझा मित्र आहे. असा विचारच करीत नाही. तो काय लिहितोय? किती ताकदीचे लिहितोय? विषयाशी तो किती तादात्म्य पावला आहे? पाण्याच्या गहराईसारखा अंदाज येत नाही असे लिखाण कुणाचे वाचले, की मला खूप आनंद होतो. मी त्याचे कौतुक करतो. भारावून जातो. अशा अनेक देशीविदेशी कलाकृतीने मी थक्क झालो आहे. असे मला लिहिता येणार नाही; पण हे कुणीतरी लिहिलेले आहे; हेच मोलाचे आहे, असे मला वाटते. जयंत पवार यांच्या काही कथा मला जागतिक पातळीवरच्या वाटतात. प्रवीण बांदेकर यांनी कोकणातली साहित्यपरंपरा तोलून धरलेली आहे. ही माझ्यादृष्टीने मोठी गोष्ट आहे. अनेक मोठे लेखक एकमेकांचा द्वेष करतात. कटकारस्थाने करतात. त्याचा काडीचाही उपयोग नाही. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल; पण तो मुळात मोठा आहे. त्याला तुम्ही कसे थांबवणार? माणसे मोठी असतात; पण मनाने छोटी असतात.

देवधेकर हे कोकणातील समकालीन काळातील महत्त्वाचे लेखक आहेत; पण तेवढेच ते लेखक म्हणून समाजातील सगळीच उतरंड समजून घेणारे आहेत. म्हणूनच अनेक लेखक स्वतःच्याच जगण्याच्या वर्तुळापुरते मर्यादित राहतात आणि लिहितात, पण सर्व समाजाची व्याममिश्रता समजून घेणारा देवधेकरसारखा गुणी लेखक कोकणच्या आजच्या साहित्य चळवळीने दुर्लक्षित ठेवला आहे. पण पुढील काळात त्यांच्या कथेची दखल एकूणच मराठी साहित्य चळवळीला घ्यावी लागेल हे निश्चित!

अजय कांडर

(लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत.)

मो. क्र. ९४०४३९५१५५