आगीत होरपळून ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील घटना : ४३ जणांची प्रकृती


04th October 2022, 12:26 am
आगीत होरपळून ५ जणांचा मृत्यू

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

भदोही : उत्तर प्रदेशातील भदोही येथील नवरात्रीच्या मंडपाला रविवारी रात्री आग लागल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला.

यामध्ये ३ मुले आणि २ महिलांचा समावेश आहे. भगवान शंकर-कालीमातेची लीला कलाकार साकारत असताना ही घटना घडली. यावेळी स्टेजसमोर दीडशेहून अधिक लोक बसले होते. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुले होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती सुरू असताना अचानक आग लागली. यामुळे एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. मोठी गर्दी असल्याने लोक बाहेर येण्यापूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आजूबाजूच्यांनी कसे तरी लोकांना बाहेर काढले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. यानंतर ही आग संपूर्ण मंडपात पसरली. दुर्गापूजेची परवानगी घेण्यात आली. मात्र, अग्निशमन विभागाची गाडी परिसरात उभी नव्हती. त्यामुळे सुरुवातीची २० मिनिटे मंडपावर पाण्याचा फवारा पडला नाही. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. २ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. यादरम्यान जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. आतमध्ये मातेच्या गुहेसारखा मंडप होता असे सांगितले जात आहे. एका बाजूला मातेची मूर्ती होती. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीच्या माहितीनूसार, शंकर आणि कालीमातेच्या लीला साकारली जात होती. आरतीची वेळ झाली होती. त्यामुळे पंडालमध्ये १५० ते २०० लोक उपस्थित होते. अचानक आग लागली. आग लागल्याचे पाहून आम्ही धावतच पोहोचलो. लोकांनी बाहेर पळावे म्हणून पडदा ओढला आणि फाडला.

तपासासाठी एसआयटी स्थापन, चार दिवसांत देणार अहवाल वाराणसीचे एडीजी राम कुमार यांनी या घटनेच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे. या टीममध्ये भदोहीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (वित्त आणि महसूल), अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि अग्निसुरक्षा अधिकारी यांचा समावेश आहे. हे तपास पथक चार दिवसांत अहवाल देईल. डीएम गौरांग राठी यांनी सांगण्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.