पीएफआयच्या होते निशाण्यावर, छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांतून उघड
न्यूज डेस्क । गोवन वार्ता
तिरुअनंतपुरम : केंद्र सरकारने केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांना वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. नेत्यांवर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एनआयने २२ सप्टेंबर रोजी १५ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या ९३ ठिकाणांवर छापे टाकले होते. यादरम्यान, केरळ पीएफआय सदस्य मोहम्मद बशीर यांच्या घरातून एक यादी मिळाली. ज्यामध्ये आरएसएसच्या पाच नेत्यांची नावे पीएफआयच्या रडारवर होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण आणि गुप्तचर यंत्रणांनी गृह मंत्रालयाला माहिती दिली होती. त्याआधारे हे सुरक्षा कवच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना देण्यात आले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा शाखेकडे सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी दोन ते तीन कमांडो तैनात
वाय श्रेणीअंतर्गत प्रत्येक नेत्याच्या सुरक्षेसाठी दोन ते तीन कमांडो तैनात केले जातील. बिहार भाजपचे अध्यक्ष आणि पश्चिम चंपारणचे खासदार संजय जयस्वाल यांनाही अशीच सुरक्षा देण्यात आली आहे. जूनमध्ये ‘अग्निपथ’ भरती योजना सुरू झाल्यानंतर त्याच्या आणि इतर भाजप नेत्यांच्या विरोधानंतर त्याला सुरक्षा देण्यात आली होती. नंतर ती मागे घेण्यात आली, परंतु आता पुन्हा स्थापित करण्यात आली आहे. संघाचे पाच नेते आणि संजय जयस्वाल यांच्या सहभागानंतर आता १२५ लोक सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा कवचाखाली आले आहेत.
पीएफआयचे तामिळनाडूतील मुख्यालय सील
तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी राज्यातील प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या कार्यालयांना सील ठोकण्यास सुरुवात केली. चेन्नई कॉर्पोरेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर पीएफआय तामिळनाडूच्या मुख्य कार्यालयाचे दरवाजे तोडण्यात आले. यानंतर अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासली आणि पीएफआयचे मुख्यालय सील केले.