भ्रष्टाचार आरोपांवरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
फोटो : पोलीस ठाण्यातही आपले आंदोलन सुरू ठेवताना आपचे नेते व कार्यकर्ते.
__
पणजी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे सरकारच्या विरोधात संताप आहे. करोनाच्या काळातील भ्रष्टाचारामुळे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय, हे सरकारने समजावून सांगितले. मलिक यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणे गरजेचे आहे; मात्र सत्ताधारी पक्ष मलिक यांना प्रतिसवाल करून विषयांतर करत आहे, असे प्रतिपादन अापचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले.
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असताना इतर पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहेत. केवळ औपचारिकता म्हणून ते राज्यपालांना भेटून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. भ्रष्टाचारासारख्या गंभीर विषयावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही म्हांबरे म्हणाले. मलीक यांनी पंतप्रधानांकडे गोव्यातील सरकार भ्रष्ट असल्याची तक्रार केली होती; मात्र मोदींनी त्यांनाच गोव्यातून मेघालयला पाठवले. समान्य जनतेचा आवाज म्हणून आपने नेहमीच अन्याय आणि गैरप्रकारांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील आपचे सुमारे ५०० कार्यकर्ते मंगळवारी पणजीत आझाद मैदानावर दाखल झाले होते; मात्र त्यांना अडविण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. अनेकांना धक्काबुक्की, तर अनेकांना लाठीचा मारही खावा लागला. ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांची सुटका करण्यात आली, असे अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.