विचारगर्भ विरागी, तरुणाईसाठी प्रेरणा

परामर्श

Story: उर्मिला राजोपाध्ये |
10th January 2021, 01:00 pm
विचारगर्भ विरागी, तरुणाईसाठी प्रेरणा

इतिहासाने १२ जानेवारी १८६३ या दिवसाची नोंद घेतली, कारण त्या दिवशी एका महात्म्याचा जन्म झाला होता. परकीय आक्रमणांनी गांजलेल्या, सततच्या दुष्काळांनी शिणलेल्या त्या काळात एका तेजोपुरुषाचा जन्म होणं ही उज्ज्वल भविष्याची नांदीच म्हणावी लागेल. नरेंद्रनाथ दत्त नामक या ओजस्वी कुडीला नियतीने अल्पायुष्य दिलं, मात्र, त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तरुण पिढीला मार्गदर्शित करण्याची क्षमता आहे. या कालातीत विचारधारेमुळेच स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन ‘युवक दिन’ म्हणून साजरा करणं औचित्यपूर्ण ठरतं. विवेकानंदांचं संपूर्ण चरित्र वेधक आहे. आपल्या तोकड्या आयुर्मानात एखादा माणूस वैश्विक पातळीवर किती मोठी ओळख मिळवू शकतो, हे त्यांच्या चरित्रवाचनातून समजतं. त्यांची भारदस्त छबी आजच्या सेल्फीप्रेमी युवकवर्गालाही भारावून टाकते. आजही ग्रंथालयांमध्ये त्यांच्या ग्रंथांची, पुस्तकांची पारायणं होतात. विवेकानंदांवरच्या व्याख्यानांना युवावर्गाची लक्षणीय गर्दी होते आणि त्यांचे विचार जाणून घेतल्यानंतर आपल्या सुखासिन आयुष्याला वळसा घालून अनेक तरुण आडवाटेने कष्टप्रद प्रवास करत समाजाभिमुख ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हीच बाब स्वामी विवेकानंदांचं महत्त्व आणि महात्म्य पटवून देण्यास पुरेशी आहे.

तारुण्य उत्साहाने सळसळत असतं. आयुष्यातला वसंत मानला जाणारा हा काळ उत्तुंग विचारांनी भारलेला असेल तर हातून अलैकिक कार्य घडण्याची शक्यता बरीच जास्त असते. म्हणूनच विवेकानंदांसारख्या महनीयांचे विचार, त्यातली घनता, खोली या वयातच जाणून घ्यायला हवी. शरीर आणि मनाची उत्तम साथ असलेला हा काळ शिक्षण, कारकिर्द आणि अर्थार्जन या त्रिसूत्रीबरोबर आत्मिक उन्नतीच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा असं मानणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीने विवेकानंद नामक विभूतीचं अंतरंग जाणून घेणं गरजेचं आहे. कारण विवेकानंदांच्या विचारांमध्ये प्रत्येकाच्या मनातल्या चेतनेला, भावनेला, सहिष्णूतेला, अस्मितेला हात घालण्याची ताकद आहे. तो शक्ती, बुद्धी आणि विवेकाचा सुरेख संगम असणारा एक घाट आहे. या ठिकाणी विसावणाऱ्याला केवळ अध्यात्मच नव्हे तर जीवनाच्या सर्वांगांचा नव्याने बोध होतो. हा बोध त्यांच्या बालपणीच्या कथांमध्ये सापडतो, अल्लड कुमारवयात सापडतो आणि प्रगल्भ युवावस्थेतही त्याचं दर्शन घडतं. म्हणून या तेजोपुरुषाचा आदर्श आयुष्याला नवी परिमाणं दिल्याशिवाय रहात नाही.

स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातली रंजकता त्यांच्या जन्मापासूनच सुरू होते. अतिशय श्रीमंत घरात जन्मलेल्या नरेंद्रने वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत ख्यालीखुशालीतलं बालपण अनुभवलं. विश्वनाथबाबू आणि भुवनेश्वरी या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या नरेंद्रला घरात वाचन, लेखन, कला यांचेही संस्कार मिळाले. लहान वयातच नरेंद्र पखवाज आणि तबला वाजवायला, शिकवायला शिकला. ध्रुपद गायकी शिकला. तो उत्तम स्वयंपाक करायचा. मनोहारी आणि मौलिक बोलायचा. त्याला पित्याकडून कला आणि मातेकडून प्रखर स्मरणशक्तीचा वारसा मिळाला होता. त्याने परिश्रमपूर्वक गतिमान वाचण्याची कला अवगत केली होती. पानातली पहिली आणि शेवटची ओळ वाचल्यानंतर आणि बाकीच्या मजकुरावरून धावती नजर फिरवल्यावरही संपूर्ण तपशील त्याच्या क्षणात लक्षात यायचा. कुशाग्र बुद्धीला तो देवाचं वरदान न मानता प्रयत्नांती मिळणारं फळ समजायचा. त्याच्याभोवती सतत मित्रांचं वलय होतं. पण, घरालाच एक शाप होता. या घरात विरक्तीचं वारं वहायचं. त्याचे काका तरुणपणीच बायको आणि मुलाला सोडून संन्यासी झाले होते. नरेंद्रमध्येही नकळतपणे ही झाक दिसत होती. त्याची दानप्रवृत्ती इतकी उत्कट होती की, गल्लीच्या तोंडाशी एखादा फकीर आला तर तो जवळ असेल नसेल ते सर्व त्याला अर्पण करायचा. याच कारणाने आई कोणाही फकिराला नरेंद्रच्या आसपासही फिरकू द्यायची नाही. याच नरेंद्रला वयाच्या सोळाव्या वर्षी आपला जन्म कशासाठी आहे, हा मूलभूत प्रश्न पडला आणि त्याच्या जीवनप्रवासाने वेगळं वळण घेतलं.

हा प्रश्न त्याने भेटेल त्या महात्म्याला विचारला आणि ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्येकाचा जन्म आहे हे उत्तर मिळाल्यावर ‘मग तुम्हाला ईश्वर दिसलाय का?’ असा प्रतिप्रश्न केला. अर्थातच कोणीच या प्रश्नाचं खंबीर उत्तर दिलं नाही. याच कारणामुळे त्यानं ब्राह्मो समाजाचं स्वीकारलेलं सदस्यत्त्वही त्यागलं आणि अशाच अवस्थेत असताना सुरेंद्रनाथ मित्र नावाच्या साधकांकडे रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्रची पहिली भेट झाली. ठाकूरजींना पाहिल्यावर पहिल्या भेटीत ‘हा कोणी पागल म्हातारा आहे’ अशी त्यांची धारणा झाली होती. नरेंद्रनी ठाकूरांनाही तुम्ही ईश्वर पाहिलाय का हा प्रश्न विचारला आणि, ‘हो, मी ईश्वराला पाहिलंय’ असं उत्तर मिळालं आणि त्यांना एक नवा प्रकाश भेटला. गुरुचं मार्गदर्शन लाभल्यावर नरेंद्रच्या विचारांना धार आली. ठाकूरजींनी नरेंद्रला दिव्यानुभूती दिली. स्वत:च्या उजव्या पायाचा अंगठा त्याच्या खांद्यावर टेकवून निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला. मात्र, समाधी अवस्थेत रमण्यासाठी तुला दु:खीतांचा संसार उन्नत करायचा आहे, तुला जग जिंकायचं आहे असं सांगितलं आणि नरेंद्रला दिशा मिळाली. त्यानंतरचा नरेंद्र पूर्णपणे वेगळा होता. वडिलांच्या पश्चात संपत्तीचा क्षय झाला, काका-काकूंनी जगणं असह्य केलं, बहिणीने आत्महत्या केली, घरात खाण्यासाठी घास मिळेना, कोर्ट-कचेऱ्या मागे लागलेल्या, आयुष्यभर श्रीमंतीत जगलेल्या आईच्या अंगावर धडकं वस्त्र मिळेना. अशा ग्रहदशा फिरलेल्या अवस्थेतही नरेंद्रने साधना सुरु ठेवली आणि आपल्याबरोबर अन्य साधकांनाही योग्य मार्गावर ठेवलं.

या अवस्थेतही त्यांनी तब्बल अडीच वर्षं परिक्रमा केली. सर्वधर्म परिषदेसाठी जावं असा आदेश गुरुंकडून मिळाल्यानंतर देणगीस्वरुपात गोळ्या केलेल्या अर्थसहाय्याने त्यांनी प्रवासाची तयारी केली. याच सुमारास जिवलग मित्र आणि खेतडीचे संस्थानिक अजित सिंह यांच्या मुलाच्या जन्मानिमित्त असलेल्या सोहळ्यानिमित्त त्यांना खेतडीस जावं लागलं. या अजितसिंगांनीच त्यांना अर्थसहाय्य केलं आणि ‘विवेकानंद’ ही नवी उपाधी दिली.

 शिकागोपर्यंतच्या प्रवासात त्यांची जमशेदजी टाटांशी भेट झाली. ते चीनला गेले, जपानला गेले आणि कॅनडामार्गे शिकागोला पोहोचले. मात्र, संन्यस्थ अवस्थेत काहीच सांभाळण्याची सवय नसताना बरोबर होतं-नव्हतं ते सगळं गमावलं. शिकागोत राहण्याची आणि खाण्यापिण्याची भ्रांत होती. मात्र, दैवी चमत्कारच म्हणावा लागेल की, एका स्त्रीनं स्वत:च्या घरात राहण्याची व्यवस्था केली आणि प्रो. राईट यांनी या परिषदेत विवेकानंदांचं व्याख्यान होईल, अशी व्यवस्था केली. हा संपूर्ण कटकटीचा आणि तणावाचा काळ असूनही स्वामीजींनी ‘माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ या पहिल्या वाक्यानेच श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आणि संपूर्ण परिषदेवर अधिराज्य गाजवलं. पंधरा दिवस चाललेल्या या परिषदेच्या नंतरच्या सर्व दिवसात श्रोत्यांनी बाकीच्यांची रटाळ भाषणं ऐकावीत म्हणून स्वामीजींचं भाषण सर्वात शेवटी ठेवलं जात असे आणि त्या आमिषानेच श्रोते बसून असत. अशा रितीने स्वत:चाच धर्म श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा मिशनऱ्यांचा सुप्त हेतू स्वामीजींनी हाणून पाडला आणि हिंदू धर्मातलं अद्वैत तत्त्वज्ञान सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे ठसवलं.

स्वामीजींचा एकूणच जीवनक्रम तरुणांसाठी दिशादर्शक आहे. ‘मी मनाचं ऐकत नाही तर मन माझं ऐकतं’ हा आत्मविश्वास असलेल्या स्वामीजींनी नेहमीच बलदंड शरीर आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा आणि गुरुचं ऋण मानलं. शेवटपर्यंत आजार आणि कौटुंबिक कलहाचा सामना करत असूनही त्यांनी साधकांना राष्ट्रप्रेमाचे धडे दिले. त्यांच्यात चैतन्य जागृत केलं. ‘मातीत खेळल्यानं मन आणि मती स्थिर होते’, ‘रुबाबशीर व्यक्तिमत्त्व आणि योग्य देहबोली याने प्रभाव पडतो’ हे त्यांचे विचार आजच्या काळालाही लागू पडतात. लचकत, मुरकत आणि नाटकी बोलण्यावर कठोर आघात करणारे स्वामीजी सत्य आणि सहिष्णुतेचा आग्रह धरताना दिसतात. हाच आग्रह आजच्या पिढीनेही धरायला हवा. कारण आजच्या तरुणाईलाही कुशाग्र बुद्धिमत्तेचं वरदान मिळालं आहे. आयुष्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देखणी चौकट मिळाली आहे. आजही विवेकवादाची कास धरणाऱ्या आपल्या देशाकडून जगाला आशा आहे. म्हणूनच या पथावरुन पुढे जाण्यासाठी विवेकानंदांच्या विचारांची शिदोरी घ्यावी आणि बिनघोर मार्गक्रमणा करावी, हे उत्तम.

(लेखिका साहित्यिक आहेत.)