देशात करोना समूह संसर्गाच्या टप्प्यात

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची अखेर कबुली


18th October 2020, 11:18 pm

नवी दिल्ली : भारतात करोना समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी दिली. पण हा समूह संसर्ग केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरता मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्यात करोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
राज्यात समूह संसर्गाची प्रकरणे समोर आल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावरून इतर राज्यांमध्ये देखील समूह संसर्ग सुरू आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन यांना केला गेला. वर्धन यांनी हे वक्तव्य त्यांच्या रविवारीच्या 'रविवार संवाद' वेबिनारमध्ये दिले. दरम्यान, करोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदा समूह संसर्गाची कबुली दिली आहे. यापूर्वी त्यांनी नेहमी समूह संसर्गाचा इन्कार केला होता.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जुलैमध्ये एक मार्गदर्शन दस्तऐवज जारी केले होते. ज्यात एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात भारतात समूह संसर्ग सुरू झाल्याचे नकळतपणे उघड झाले होते. हे दस्तऐवज नंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढण्यात आले होते.
पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात समूह संसर्ग प्रसार होण्याची शक्यता आहे. खास करून दाट लोकवस्तीत हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण समूह संसर्ग हा संपूर्ण देशभरात नाही. हा फक्त मार्यादित राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच आहे. _ डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री 

हेही वाचा