यूपीतील घटना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
कासगंज : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे शनिवारी मोठी दुर्घटना घडली. येथील तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॉलीमध्ये ५४ लोक होते. अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. हे सर्व लोक एटा येथील जैथरा येथील रहिवासी आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन तलावात पडला. हे लोक माघी पौर्णिमेला कासगंजमधील कादरगंज घाटावर ट्रॅक्टर-ट्रॉलीतून गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. रियावगंज पटियाली मार्गावरील गधई गावाजवळ हा अपघात झाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्ता सोडून तलावात पडला.
अपघातानंतर ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले. काही वेळातच मोठ्या संख्येने लोक जमा झाले. येथील डीएमनी सांगितले की, अपघातात ७ मुले आणि ८ महिलांचा समावेश आहे. अनेक जण अपघातात जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.
स्थानिक लोकांनी सांगितले की, ट्रॅक्टर-ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात गेली. त्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या बाजूला उभे असलेले लोक बिथरून पाण्यात पडले. तर ट्रॅक्टर-ट्रॉलीत बसलेले लोक पाण्याखाली गेले. अनेकजण ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली गाडले गेले.